Saturday, 29 April 2017

प्रांताप्रांताच्या सीमा ओलांडणारा संत : सेना महाराज

जातां पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटतांचि!!
या सुखाची उपमा नाही त्रिभुवनीं, पाहिली शोधोनि अवघी तीर्थे!!
ऐसा नामघोष पताकांचे भार, ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठें!!


श्रीविठ्ठल आणि वारकरी सांप्रदायाने फक्त जातीपातींच्या सीमा मोडल्या नाहीत तर प्रांताप्रांताच्याही सीमा ओलांडल्या. संत सेना महाराज त्याचेच एक उदाहरण. मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. घरात बादशाहाची हजामत करण्याचा मान. शरीराने आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन मात्र देवपूजेत रमलेले. अशी एक गोष्ट सांगतात की, एकदा बादशाहाने त्यांना हजामतीला बोलावले. तर सेना महाराज पूजेत रममाण झालेले. तेव्हा बादशाहा चिडला आणि त्याने सेना महाराजांना पकडण्याचे आदेश दिले.
तेव्हा प्रत्यक्ष विठ्ठलाने बादशाहाची हजामत केली आणि सेना महाराजांना वाचविले. देव आणि भक्त यातील नाते अधोरेखित करण्यासाठी मांडलेल्या या कथेतील भावार्थ समजून घ्यायला हवा. सेना महाराजांनी आपल्या अभंगातूनही याच भक्तिरसाची उपासना केलेली आढळते.
सेना महाराजांचे वडील देविदास बांधवगडच्या राजाकडे नाभिकाचे काम करीत असत. आई प्रेमकुंवरबाई सात्विक स्वभावाची गृहिणी होती. वडील देविदासानंतर परंपरेनुसार राजाकडील नाभिकाचे काम सेना महाराजांकडे आले. सेना महाराजांचा लहानपणापासूनच भक्तीमार्गाकडे ओढा होता. त्यांच्या हिंदी मातृभाषेतून ते भक्तीरचना सुध्दा करु लागले. कालांतराने महाराष्ट्र्रातील त्या काळच्या संतांची माहिती सेना महाराजांना मिळाली. त्या संतांच्या व पंढरपूरच्या विठ्ठल भेटीसाठी ते आतूर झाले. तिर्थयात्रा करित करीत ते इकडे आले संत निवृत्तीवरनाथ, संत ज्ञानेश्र्वर, संत नामदेव व इतर त्यांचे समकालीन संत होते. या महान संतांच्या सान्निध्यात येऊन ते महाराष्ट्र्राच्या पावनभूमीत रममाण झाले. त्यांनी मराठी भाषा आत्मसात करुन मराठी भाषेवर इतके प्रभूत्व मिळविले की, मराठी भाषेत त्यांनी अनेक उत्कृष्ट अभंगांची निर्मिती केली. भागवंत संप्रदायातील वारकरी भक्तीरसात त्यांनी स्वत:ला झोकून दिले.
एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तिरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुध्दा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्र्वर, तुकारामाइतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ मानले जाते. संत सेना महाराजांचे अभंग मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश, भाषा, जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरुन सिध्द होते.
नामदेव, तुकाराम, सेना न्हावी, गोरा कुंभार, चोखामेळा अशा अनेक संतांनी त्यांच्या अभंगवाणीतून समाज प्रबोधन केले. संसारात राहून सुध्दा ईश्र्वर भक्ती करुन परमार्थ साधला जाऊ शकतो हे लोकांना सांगितले. कर्मठ उच्चवर्णियांनी निर्माण केलेली उच्चनीच, जातीभेद ही परंपरा मोडीत काढण्यासाठी उपदेश केला. स्वत:ही तसे वागले. त्यांनी निर्माण केलेले काव्य, अभंग, यांचाच जनतेवर इतका प्रचंड प्रभाव पडला की इतर काही चमत्कारांनी त्यांचे मोठेपण सिध्द करण्याची काहीच गरज नसावी.
नंतर महाराष्ट्र्रातील वास्तव्य संपवून सेना महाराज पुन्हा त्यांच्या जन्मभूमीस तीर्थाटन करीत निघून गेले. त्यांच्या हिंदी भक्तीरचना उत्तरेकडील सर्व हिंदी प्रदेशातून म्हटल्या जातात. महाराजांनी काही रचना पंजाबी भाषेत सुध्दा केल्या आहेत. 'जाता पंढरीसी सूख वाटे जीवा' असे म्हणत हा वारकरी संत विठ्ठलचरणी लिन झाला. पंढरी ही त्यांच्या जीवनाचा ध्यास बनली. या महान भगद् भक्ताची श्रावण वद्य द्वादशीला पुण्यतिथी साजरी केली जाते.

आम्ही वारीक वारीक, करू हजामत बारीक !!
विवेक दर्पण आयना दाऊ, वैराग्य चिमटा हालऊ !!
चौवर्णा देऊनी हात, सेना राहिला निवांत !!  

No comments:

Post a Comment