संत देहाने भिन्न असती, परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती!
साधने जरी नाना दिसती, तरी सिद्धान्तमति सारखी!
तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे आहे. त्यांचा जन्म एप्रिल २७, १९०९ मध्ये यावली (जि. अमरावती) येथे झाला. त्यांचे आई मंजुळाबाई व वडील बंडोजी व गुरू आडकोजी महाराज होते. अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की, राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सूचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. ‘आते है नाथ हमारे’ हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
आपली वाणी आणि लेखणी, शक्ती आणि भक्ती यांचे सर्व सामर्थ्य एकवटून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामाजिक जागृतीचे आणि प्रगतीचे प्रयत्न सातत्याने केले. आपल्या देशातील झोपी गेलेली खेडी जागी व्हावीत, अज्ञान, लोकभ्रम आणि सामाजिक निष्क्रियता यामुळे ग्रामीण जीवनाची झालेली दुर्दशा नाहीशी व्हावी, तिथल्या समाजाची सुधारणा व्हावी व सुखी जीवनाच्या दृष्टीने वाटचाल व्हावी, ग्रामस्थांच्या आयुष्यात चैतन्य निर्माण व्हावे यासाठी त्यांनी कार्य केले. सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने भाग्यशाली असलेला हा देश शिक्षण, आरोग्य आणि धनधान्य याही बाबतीत तितकाच वैभवशाली का नाही, या विचाराने संत तुकडोजी महाराजांचे मन सदैव तळमळत असे. सेवास्वधर्म, राष्ट्रीय भजनावली, अनुभव सागर भजनावली हे त्यांचे साहित्य. अंधश्रद्धेवर त्यांनी त्यांच्या लेखनातून, कीर्तनातून प्रहार केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी आपल्या खंजिरी भजनाच्या माध्यमातून आपल्या विचारसरणीचा पुरस्कार केला. अशा या महान राष्ट्रसंताने ११ ऑक्टोबर, १९६८ ला देह ठेवला. त्यांचे विचार आजही समाजात जिवंत आहेत.
या झोपडीत माझ्या राजास जी महाली,
सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली,
या झोपडीत माझ्या !!
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या!!
No comments:
Post a Comment