Monday, 10 April 2017

गणेशभक्त संत मोरया गोसावी

गणेशभक्त संत मोरया गोसावी

चिंतामणी देवा गणपतीसी आणा, करवावे भोजना दुजे पात्री !!
देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमानाभीतरी नागवलो !! 


मोरया गोसावी हे सतराव्या शतकातील संत. श्री गणेशाचे ते मोठे भक्त होते. मोरया गोसावी हे शाहू महाराज व पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे समकालीन होते. कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील बसव तालुक्यातील शाली हे त्यांच्या आई-वडिलांचे मूळ गाव. मोरया यांचे आई- वडील वामनभट शाळिग्राम आणि पार्वतीबाई हे वैदिक कुटुंबातील. ते दोघे पुण्यातील मोरगावला येऊन स्थिर झाले. तेथे कऱ्हा नदीचे खळाळणारे पाणी, मोरयाची भव्य मूर्ती याने भुरळ घातली. त्या परिसराबद्दल काही अद्‍भुत कथा वामनभटांच्या एेकल्या होत्या. ब्रह्मदेवाने मोरगावला तपश्चर्या केली, त्याच्या कललेल्या कमंडलुतून कऱ्हा नदी उगम पावली या कथांमुळे वामनभट प्रभावित झाले होते. त्यांनीही अनुष्ठान मांडले.

 मोरयाने स्वप्नात येऊन सांगितले, की ‘तुझ्या नशिबात पूत्र नाही.’ त्यामुळे वामनभट खट्टू झाले; पण त्यांनी धीर सोडला नाही. त्यांनी पुन्हा तपश्चर्या सुरू केली. शेवटी, पार्वतीबाईंचा पाळणा हलला. त्यांनी बाळाचे नाव मोरया हेच ठेवले. मोरया वाढू लागला. त्याची मुंज झाली. त्याचे वेदाध्ययन झाले. त्याच्यात तपश्चर्येची ऊर्मी जागी झाली. त्यांना नयन भारती गोसावी गुरू भेटले. मोरया त्यांच्या प्रेरणेने थेऊरला आले. त्याची तपश्चर्या मुळा-मुठेच्या काठी चिंतामणीजवळ सुरू झाली. 
मोरयाच्या बेचाळीस दिवसांच्या तपश्चर्येनंतर चिंतामणीने मोरयाला दर्शन दिले. मोरयांनी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी चिंचवड सोडावे, चतुर्थीपर्यंत मोरगावला परत यावे, मोरयाची पूजाअर्चा करावी, पंचमीचे पारणे करून परतावे असा त्यांचा नियम होता. मोरया गोसावींच्या मोरगाव वारीत कधी खंड पडला नाही. मोरया गोसावींना १६१६ पासूनच जमिनी इनाम म्हणून मिळू लागल्या होत्या. त्यांना आदिलशहा, निजामशहा, शहाजीराजे, शिवाजीराजे यांच्याकडून मोरगाव, कुंभार वळण, चिंचवड, चिंचोली या आणि इतर अनेक ठिकाणच्या जमिनी मिळाल्या. संप्रदाय वाढला, अन्नछत्र-सदावर्त, उत्सव-यात्रा, पूजाअर्चा यांचा पसारा वाढला. मोरया गोसावी वयोमानाप्रमाणे थकले.
 मार्गशीर्ष वद्य षष्ठी २५ जानेवारी १६५७ या दिवशी सकाळीच गुंफेत जाऊन बसले. मोरया गोसावींनी संजीवन समाधी घेतली. त्यावर त्यांचे पूत्र थोरल्या चिंतामणी महाराजांनी मोठी शिळा ठेवली आणि त्यावर सिद्धी-ऋद्धीसह मोरयाची मूर्ती बसवली. चिंतामणी महाराजांनी १६५८-५९ मध्ये त्यावर देऊळ बांधले. समाधीच्या प्रवेशद्वारावर कोथळ्याहून आणलेली अर्जुनेश्वर शंकराची मोठी पिंड बसवली.

वाड वेळ झाला शिळे झाले अन्न, 
तटस्थ ब्राह्मण बैसलेती!! 
तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, 

आणिन त्वरित मोरयास!!

No comments:

Post a Comment