Saturday, 31 December 2016

संत नामदेव : वारकरी सांप्रदायातील क्रांतिकारक भक्त

संत नामदेव : वारकरी सांप्रदायातील क्रांतिकारक भक्त
देवांनी सुद्धा भारतभूमीवरच जन्म घेतला. ही देवभूमीच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. संत हे चालते फिरते देवच मानले जातात. आपल्या देशात संतांना गुरू मानण्याची परंपरा आहे. गुरूचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीतच आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ आणि समर्थ रामदास हे मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते आणि महाराष्ट्रधर्माचे संत होते. त्यांच्यामुळे आध्यात्मिक समता घडली. माणूस उभा राहिला तरच देश उभारेल, हे जाणून संतांनी जागृतीचे काम केले. तर जाणून घेऊया अशाच काही संतांबद्दल.
नामदेव किर्तन करी पुढे देव नाचे पांडूरंग। जनी म्हणे नामदेवा बोला !!
संत नामदेव महाराज संत परंपरेतील मोठे भक्त. याचा जन्म २६ ऑक्टोबर १२७०चा. संत नामदेवांनी मोठी भक्ती चळवळ घडवली. नामदेव महाराज एका शिंपी परिवारात जन्मले. त्यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी गावात. वडील दामाशेटी तर आई गोणाई. आऊबाई बहीण. त्यांच्या पत्नीचे नाव राजाई. नारायण, महादेव, गोविंद, विठ्ठल ही चार मुलं. लिंबाई मुलगी. लाडाई, गोडाई, येसाई, साखराई या सुना. असा छान बहरलेला संसार त्यांनी केला. त्यांच्या देवपिसे होऊन केलेल्या भक्तीला सुरुवातीला विरोध झाला. पण नंतर त्यांनी सगळ्यांना आपलं बनवलं. या सगळ्या परिवारानेच नामदेवांच्या प्रभावात अभंगरचना केली आहे.
नामदेव ज्ञानदेव भेटीतून विचारांचा नवा प्रवाह उदयाला आला. ज्ञान आणि भक्तीचा हा संगम होता. त्यातून कीर्तनाच्या रंगी नाचत देशभर ज्ञानदीप लावण्यासाठी दोघांच्याही प्रभावातली सगळी संतमंडळी एकत्र झाली. त्यांची एकत्र तीर्थयात्रा सुरू झाली. महाराष्ट्र पिंजून गुजरात, राजस्थान आणि पंजाबापर्यंत हे संत गेले. माणसाला माणूस बनवण्याची ही धडपड होती. चोखामेळ्यासारखे अस्पृश्यही टाळकरी बनून त्यांना साथ देत. जनाबाईंसारखी जातीने अतिशूद्र असणारी स्त्री कीर्तनाचं संचलन करत असे. ज्ञानदेव अभंग सूचवत. अशा जातीपातीच्या भिंती तुटत होत्या. गोरा कुंभार, सावता माळी, परिसा भागवत, चोखा महार आणि त्यांचा परिवार, जगन्मित्र नागा, नरहरी सोनार, दासी जनी सगळेच त्यात होते. हे संत म्हणजे टाळकुटे विरक्त नव्हते तर त्या त्या समाजांचे धार्मिक, वैचारिक आणि सामाजिक नेतेच होते.
या ऐतिहासिक तीर्थयात्रेचं उद्यापन पंढरपुरात चंद्रभागेच्या वाळवंटावर झालं. स्पृश्य अस्पृश्य, उच नीच असे सगळे भेदाभेद सहभोजनात गळून पडले. धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या नीच जातिभेदांना दिलेला हा मोठा धक्का होता. पुढे नामदेवांनी पंढरपुरातल्या विठ्ठलमंदिराच्या दारात उभी केलेली चोखोबांसारख्या अस्पृश्याची समाधी त्यांच्या खंबीर क्रांतिकारत्वाचा पुरावाच आहे. यानंतर लवकरच ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली. त्याचा अत्यंत हृदयद्रावक आंखो देखा हाल नामेदवांनी लिहून ठेवलाय. पुंडलिकापासून जनाबाईंपर्यंतच्या भक्तांचं चरित्र लिहून नामदेवांनी या क्रांतिकारक चळवळीचं मोठंच डॉक्युमेंटेशन करून ठेवलंय. ते महाराष्ट्रातले सगळ्यात महत्त्वाचे चरित्रकार मानायला हवेत आणि ते आद्य आत्मचरित्रकारही आहेत.
पंजाबात संत नामदेव दोन दशकांहून अधिक काळ राहिले. तिथे त्यांनी केलेल्या मशागतीतून शीख धर्माचा वटवृक्ष उभा राहिलाय. नारायण आणि नामदेव एकच आहे, असं मानणाऱ्या शीख परंपरेच्या गुरू ग्रंथसाहेबातही नामदेवांची ६१ पद आहेत. नामदेवांचा देशभरावरचा प्रभाव आजही पाहता येतो. महाराष्ट्र आणि पंजाबाबरोबरच राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तरांचल, हिमाचल प्रदेश या राज्यांत त्यांची मंदिरं आहेत. तामिळनाडूपासून जम्मूपर्यंतचे भक्त त्यांचं नाव अभिमानाने मिरवतात. ३ जुलै १३५० रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांनी अत्यंत समाधानाने आपला देह ठेवला. त्यांची एक समाधी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पायरीवर आहे. तर दुसरी पंजाबमधील घुमान येथे आहे. 

Friday, 30 December 2016

माळेगाव यात्रा : लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा



माळेगाव यात्रा : लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा

येळकोट येळकोट  जय मल्हार !!
शिवा मल्हारी, येळकोट येळकोट घे..!!
खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशातील बहुसंख्य जनतेचे कुलदैवत आहे. मल्लारी, मल्लारीमार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी नावे असलेल्या खंडोबारायाची महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण बारा स्थाने आहेत. त्यापैकी नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळेगाव हे एक तीर्थक्षेत्र आहे. येथील खंडोबाचे मंदीर हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराच्या सभोवताली मोठे आवार आहे. याच आवारा यात्रा भरते.  मंदिराला दगडी महाद्वार असून त्याला लागूनच छोटा बुरूज आहे. मंदीराच्या सभामंडपात मध्यभागी एका दगडी ओट्यावर मणी मल्लासुराचे दगडावर कोरलेले मुखवटे आहेत.(मंदिराचे बांधकाम चालु असल्याने सध्या हे खांब काढले आहेत) गाभाऱ्यात एका आयताकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे आहेत. निजाम राजवटीत मंदीराची व्यवस्था कंधार परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्याचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद याच्याकडे होती.
खंडोबाच्या यात्रांमध्ये मोठी यात्रा माळेगावच्या खंडोबाची यात्रा आहे. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या आंध्र, कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांसाठी प्रशिद्ध आहे. या यात्रेत वाघ्यामुरळींची गाणी, गोंधळ्यांची गाणी, वारू नाचविणे, आराध्यांची गाणी, ढोलकी-फडाच्या तमाशाचे खेळ, संगीत बारी याशिवाय बहुरूपी रायरंद, वासुदेव, स्मशान जोगी, मरीआईवाले अशा विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या कलांचे दर्शन या यात्रेतच होते. खंडोबाचा उत्सव व यात्रा मार्गशीष महिण्यात सुरू होते. पूर्वी तीन-तीन महिने माळेगावची यात्रा भरत असे. परंतु, कालाच्या ओघात सध्या ती पाच दिवस भरते. शनिवारी (ता. ३१ डिसेंबर) यात्रेचा शेवत आहे. यात्रेत देवस्वारीची गावातून पालखी निघते. या वेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो. रिसनगाव माळेगावापासून १५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते. वेशपरंपरेने आता यात्रेतील पालखीचा मान या नाईकांच्या घराण्याचा आहे. तर कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोट्याचा मान आहे.
माळेगावच्या यात्रेत भरणार गुरांचा बाजार ही तिची प्रमुख वैशिष्टये आहेत. यात्रेला ३०० वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री, शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात. या मेळ्यांमधून सामाजिक सुसंवादही घडत असतो. यात्रेत जातीअंतर्गत भांडण, तंटे, गुन्हे, कौटुंबिक प्रश्‍न, देवाणघेवाण, सोयरीकी इ. गोष्टींवर सखोल चर्चा चालत असे. व नंतर त्यांची सुनावणी होत असे. यात्रेत गोसावी, गारुडी, घिसाडी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, वैदु आदी भटक्या व विमुक्त जातींची जात पंचायत असे. माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा होय.
------------
हौशे-गवसे-नवशांची यात्रा 
--लातूर, नांदेड, परभणी या तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील माळेगाव ही खंडोबा देवस्थान आहे. सुग्या - मुग्यांची, हौशे-गवसे-नवशांची यात्रा,  माळेगाव अशी विशेषणे असलेल्या या यात्रेत जे जेजुरीत मिळत नाही, ते येथे  मिळते. सर्व जातीधर्मांचे श्रद्धास्थान, तमाशेवाले, लोकनाट्यवाले, तळागाळातील व पिढ्यानपिढ्या भटके जीवन जगणाऱ्या जाती-जमातीचे आप्तस्वकीय एकत्र येण्याचे हेच ठिकाण आहे. वर्षभराच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक करार मदार खंडेरायाच्या दरबारात होतात.
यात्रेचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे घोडे, उंट, गाढव यांचा बाजार व प्रदर्शन आणि राष्ट्रीय पातळीवर चॅम्पियन ठरलेल्या आणि दुर्मिळ असलेल्या देवणी व लालकंधारी गायी व वळूंचे प्रदर्शन. अलीकडील काळात सुरू करण्यात आलेले बचतगट प्रदर्शन व कृषी प्रदर्शनही यात्रेकरूंचे विशेषतः शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. यात्रेतील कृषी विषयक स्टॉलद्वारे शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेतीची अवजारे व अत्याधुनिक शेतीची माहिती करून देण्यास उपयोगी ठरत आहेत.
अखंडित यात्रा 
नांदेड-लातूर महामार्गावर सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेले माळेगाव बहामुनी राजवटीतच काही काळ निजामी राजवटीत होते. निजामाच्या काळातही ही यात्रा अखंडित सुरू होती. निजामाच्या काळात मंदिराची व्यवस्था राजे गोपालसिंह कंधारवाला यांच्याकडे होती. सध्या ही व्यवस्था ट्रस्ट व जिल्हा परिषदेकडे आहे. स्वयंभू वेदीवर दगडी चौरंगावर खंडोबा म्हाळसाचे मुखवटे आहेत. त्यांच्यासमोर तांदळा आहे. त्या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते. ती अशी, बिदरचा व्यापारी गाढवाच्या पाठीवर तांदळ्याच्या गोण्या घेऊन जात असताना. रात्र झाली म्हणून माळेगावला मुक्कामी थांबला. सकाळी उठून तो पुढील प्रवासाला जाण्याची तयारी करत होता. तांदळाच्या गोण्या उचलून तो गाढवांच्या पाठीवर ठेवत असताना यातील एक गोणी काही केल्या उचलत नव्हती. त्या वेळी त्याला रात्री झोपेत पडलेले स्वप्न आठवले. रिसनगाव येथील भक्ताच्या हस्ते माझी प्रतिष्ठा कर, असे काहीसे स्वप्न या व्यापाऱ्याला आठवले. रिसनगावच्या नागोजी नाईक यांनाही असेच स्वप्न पडले होते. त्यानंतर व्यापाऱ्याच्या विनंतीवरून नाईकांनी तांदळाची गोणी उघडून पाहिली असता त्यात तांदळा (शालिग्राम) सापडला. खंडोबाचे प्रतीक म्हणून व्यापाऱ्याने तांदळ्याची प्रतिष्ठापना केली. कालांतराने या ठिकाणी मंदिर उभारण्यात आले.

मानकऱ्यांची परंपरा आजही कायम 
माळेगावपासून २० किलोमीटरवर रिसनगाव येथील नाईक कुटुंबाकडे माळेगावच्या पालखीचा मान आहे. कंधारजवळील भोसी येथील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोट्याचा मान आहे. चंपाषष्टीच्या दिवशी भोसीकर कुटुंब आपले पागोटे घेऊन माळेगावला येतात. ते पागोटे मार्गशीर्ष अमावस्येच्या यात्रेपर्यंत मंदिरात ठेवतात. आजही भोसीकर कुटुंबीय चंपाषष्टीपासून अमावस्येपर्यंत पागोटे वापरत नाहीत. पूर्वी महिनाभर भरणारी यात्रा आता पाच दिवस भरते.
‘माळेगावच्या माळावरी, चारी बुरुजा बराबरीतिथे नांदतो मल्हारी, देव गं मल्लवा!!’

                                                                                                    भागवत पेटकर


Thursday, 29 December 2016

#माळेगाव यात्रा : #लोकसंस्कृतीचा ठेवा..||

माळेगाव हे महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील एक गाव असून दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील वद्य एकादशीला येथे भरणार्या खंडोबाच्या यात्रेसाठी ते प्रसिद्ध आहे. माळेगाव येथील खंडोबाचे मंदीर हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराच्या सभोवताली मोठे आवार आहे. मंदिराला दगडी महाद्वार असून त्याला लागूनच छोटा बुरूज आहे. मंदीराच्या सभामंडपात मध्यभागी एका दगडी ओट्यावर मणी मल्लासुराचे दगडावर कोरलेले मुखवटे आहेत. गाभाऱ्यात एका आयताकृती उंच दगडी ओट्यावर मल्हारी व म्हाळसा यांचे मुखवटे आहेत. निजाम राजवटीत मंदीराची व्यवस्था कंधार परगण्याचे राजे गोपालसिंग कंधारवाला व त्याचा पुत्र कंधारचा किल्लेदार अजयचंद याच्याकडे होती.
खंडोबाच्या यात्रांमध्ये मोठी यात्रा माळेगावच्या खंडोबाची यात्रा. ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राच्या लगत असणाऱ्या आंध्र, कर्नाटक यांच्या सीमावर्ती प्रदेशातील भटक्या विमुक्तांसाठी . या यात्रेत वाघ्यामुरळींची गाणी, गोंधळय़ांची गाणी, वारू नाचविणे, आराध्यांची गाणी, ढोलकी-फडाच्या तमाशाचे खेळ, संगीत बारी याशिवाय बहुरूपी रायरंद, वासुदेव, स्मशान जोगी, मरीआईवाले अशा विविध लोककलावंतांनी सादर केलेल्या कलांचे दर्शन या यात्रेत होते.  खंडोबाचा उत्सव व यात्रा दरवर्षी मार्गशीर्षातील वद्य एकादशीला सुरू होते. या दिवशी देवस्वारीची गावातून पालखी निघते. यावेळी रिसनगावचे नाईक यांचा प्रमुख मान असतो. रिसनगाव माळेगावापासून १५ ते २० कि.मी. अंतरावर आहे. या घराण्यातील नागोजी नाईकने निजामशाही विरुद्ध बंडखोरी केली तेव्हा इ.स. १८०९ मध्ये त्यांना पकडल्याचा आणि कंधार येथे तोफेच्या तोंडी दिल्याचा उल्लेख आहे. नागोजी नाईक हे खंडोबाचे मोठे भक्त होते. वेशपरंपरेने आता यात्रेतील पालखीचा मान या नाईकांच्या घराण्याचा आहे. तर कंधारजवळ असलेल्या भोसी गावातील वाणी कुटुंबीयांकडे खंडोबाच्या पागोटय़ाचा मान आहे.

माळेगावची यात्रा सुप्रसिद्ध असून यावेळी भरणार गुरांचा बाजार व विविध भटक्या व विमुक्त जातींच्या जातपंचायती ही तिची प्रमुख वैशिष्टये आहेत. यात्रेला ३०० वर्षाची परंपरा असल्यामुळे जनावरांची खरेदी विक्री, शर्यती, प्रदर्शन, कुस्त्यांची दंगल, लोककला, संगीत वाद्य, लोकनाट्य असे विविध कार्यक्रम स्थानिक समितीच्या सहकार्याने आयोजित केले जातात. पूर्वी तीन-तीन महिने माळेगावची यात्रा भरत असे. परंतु सध्या ती पाच दिवस भरते.

भटक्या जमातींच्या जीवनप्रणालीचा महत्त्वाचा घटक असलेल्या जात पंचायतींच्या सभाही या यात्रेमध्ये भरविल्या जातात. अशा प्रकारच्या मेळय़ांमधून सामाजिक सुसंवादही घडत असतो. या सभांमध्ये जातीअंतर्गत भांडण, तंटे, गुन्हे, कौटुंबिक प्रष्न, देवाणघेवाण, सोयरीकी इ. गोष्टींवर सखोल चर्चा चालते व नंतर त्यांची सुनावणी होते. या यात्रेत गोसावी, गारुडी, घिसाडी, जोशी, कोल्हाटी, मसणजोगी, नंदीवाले, पांगुळ, वासुदेव, वैदु आदी भटक्या व विमुक्त जातींची जात पंचायत असते.

माळेगावची यात्रा म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीच्या उपासकांची यात्रा होय.

Friday, 9 December 2016

भगवद्‌गीता : जीवन जगण्याचा मार्ग

भगवद्‌गीता : जीवन जगण्याचा मार्ग

भगवद्‌गीता  हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे, यांचे मार्गदर्शन करतो. भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश म्हणजे  'भगवद्‌गीता' होय. यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. भगवद्‌गीता  ग्रंथ पवित्र असल्याने  न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेतली जाते. गीताई हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत ओवीबद्ध भाषांतर आहे. भगवदगीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. 'महाभारत' या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली. . हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात.
कुरुक्षेत्रावर रणांगणामध्ये युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल, असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामध्ये गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.
भगवद्गीतेत असे सांगितले गेले आहे की, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले आणि त्याला तो देव असल्याचे पटवून दिले.  भारतीय संस्कृतीमध्ये गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की, गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' ही म्हणले जाते. तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो. त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे. महाभारतातल्या 'भीष्म पर्वा'मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामध्ये ती 'गायली' जाते. उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते. हिंदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या अर्वाचीन ग्रंथांप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहिती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही. परंतु, तरीही महाभारतात समाविष्ट असल्याने गीता 'महर्षी व्यास' यांनी लिहिली असे मानले जाते.


गीतेतील अध्याय

अध्याय १ - अर्जुनविषादयोग
अध्याय २ - सांख्ययोग
अध्याय ३ - कर्मयोग
अध्याय ४ - ज्ञानसंन्यासयोग
अध्याय ५ - कर्मसंन्यासयोग
अध्याय ६ - आत्मसंयमयोग
अध्याय ७ - ज्ञानविज्ञानयोग
अध्याय ८ - अक्षरब्रह्मयोग
अध्याय ९ - राजविद्याराजगुह्ययोग
अध्याय १० - विभूतियोग
अध्याय ११ - विश्वरूपदर्शनयोग
अध्याय १२ - भक्तियोग
अध्याय १३ - क्षेत्रक्षेज्ञविभागयोग
अध्याय १४ - गुणत्रयविभागयोग
अध्याय १५ - पुरुषोत्तमयोग
अध्याय १६ - दैवासुरसंपविभागयोग
अध्याय १७ - श्रद्धात्रयविभागयोग
अध्याय १८ - मोक्षसंन्यासयोग

Sunday, 27 November 2016

नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ..!

नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ..!


संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६,वार, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. श्री क्षेत्र आळंदीतील कार्य संपविल्यानंतर माउलींना तिर्थयात्रा करूशी वाटली. तेव्हा त्यांना आपल्याबरोबर संत नामदेव महाराज असावो म्हणून त्यांना घेण्याकरत माउली पंढरपूरला गेले.
कैलासाचा वास अधिक सिद्धबेट, विष्णूचें वैकूंठ पुरातन!
या ठिकाणी ज्ञानदेवांनी १०८ वेळा समाधी घेतली आहे. असे हे स्थळ सकळ सिद्ध आणि अनादि आहे.
यानुसार, सर्व संतमंडळी दिंड्या पताका घेउन खिन्न मनाने खेद करत अलंकापूरीत निघाले.निवृत्तीनाथ महाराज पण त्यांचाही कंठ दाटून आला. सोपान, मुक्ता, यांना तर रडूच कोसळले, नामदेव महाराजांच्या शोकास तर पारावारच राहिला नाही. त्याचप्रमाणे नारा, विठा, गोंदा, महादा आदीकरून संत मंडळींना फार वाईट वाटले. व ते खेद करत सर्व इंद्रायणीच्या तीरी आले. त्यात सर्वात पुढे नारा विठा चालत होते.अशा प्रकारे सर्व भक्तमंडळी सौदंडीच्या झाडाखाली बसले. माउली आता समाधी घेणार म्हणून सर्वांनाच खेद वाटत होता. यानंतर सर्व संत मंडळी सौदंडीच्या झाडाखालून उठून जुनाट असे पवित्र शिवपीठ येथे आले.
अशा तऱ्हेने एकीकडे माउलींच्या समाधिची तयारी होत होती तर दुसरीकडे उपस्थीतांचे कंठ दाटून येत होते. पाण्यातील मासा ज्याप्रमाणे  पाण्याविना तळमळतो त्याप्रमाणे माउली आपल्यात यापुढे नाहित. या भावनेने समस्त उपस्थित जनसमुदायाचे हृदय हेलावून गेले. प्रत्येकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावू लागल्या. त्यावेळी स्वता माऊली उपस्थितांना म्हणाले, तुम्ही जर असे करू लागले तर समाधिला उशिर होईल.
आठवाल फार, लागे उशिर समाधीसी.!!
असे म्हणून त्यांननी सिद्धेश्वरा समोरिल नंदी बाजूला सारून पूर्वीचे समाधीचे जुनाट स्थान दाखविले.
अष्टोतरशे वेळ समाधि निश्चळ, पूर्वी तुझे वहनाखाली!
नामदेव महाराज म्हणतात, हे जुनाट स्थान माउलींनी आम्हाला दाखविले हे पाहून नारा विठा गोंदा महादा यांना समाधिची जागा स्वच्छ करावयास सांगितली. नंतर हे सर्व संत मंडळी वर आली. या वेळी माउलींची सर्वांनी शोडषोपचारे पूजा केली व कंठ वाटून येउन सर्वांच्या तोंडून एकच उद्गार बाहेर आले. नामदेव महाराजांनी सर्वांना सांगितले की, तुम्ही सर्वजण भेटा माउली समाधिकडे जात आहेत. सर्व भेटल्यानंतर निवृत्तीनाथ व भगवंतनाने एका एका हाताला धरून माउलींना समाधी स्थानावर वसविण्याकरता चालले. ज्ञानदेव आता आसनावर जावून बसले व भक्त मंडळींनी त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. नंतर भगवंताने ज्ञानदेवांच्या मस्तकावर हात ठेवला नंतर दर्शन घेतले. त्यावर देव पुढे म्हणाले, हे पहा जोपर्यंत चंद्र सुर्य आहेत. माउलींची समाधी तोपर्यंत स्थिर राहिल.
देव म्हणे ज्ञानेश्वरा.चंद्र तारा जव दिनकरा!
तव तुम्ही समाधि स्थिरा,राहे तारा हे निरंतर !!
त्यावेळी त्यांची अवस्था काय झाली हे वर्णन करणे कठिण आहे.अशा परिस्थितीतही भगवंतांनी सर्वांना कठिण अंतकरणाने बाहेर आणले व त्यास शिळा बसविली. माउलींनी समाधी घेतल्यानंतर या भक्त मंडळींनी काय अवस्था झाली हे नामदेव महाराज वर्णन करतात.
वोसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला, आणिकाच्या डोळा अश्रु येती!!
अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरूपण सिद्धी नेले!!
भगवंताने देखील आपले मन पुष्कळ आवरले पण नाईलाज झाला.भगवंताच्या डोळ्याला देखिल अश्रु आले. त्यावेळी रखुमाई म्हणाल्या हो आतापर्यंत पुष्कळसे गेले त्याबद्दल खेद केला नाही. कित्येक जन्माला आलेत त्याबद्दल आनंदही नाही. देव रूक्मिणीला म्हणतात की, रूक्मिणी मी हा एक योगी डोळ्याने पाहिला आहे आणि त्रैलोक्याचे हेच एक जीवन आहे.
देवो म्हणीती रूक्मिणी, हा येचि युगी देखील नयनी!
हेचि ज्ञान संजिवनी,जाण त्रिलोक्यासी!!
भगवंत आतापर्यंत कोणाकरिताही रडले नाही परंतु माउलींच्या समाधिचे वेळी प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. तेवढ्यात नामदेव  महाराज पुढे आले व भगवंताला म्हणाले माउली सोडून गेले त्यासाठी माझा जीव कासावीस होत आहे. भगवंत नामदेवांची सजूत घालू लागले. असे नामदेवा रडू नकोस ते कोण होते त्याची तुला कल्पना नाही. अशाप्रकारे सर्वच मंडळी शोक करत होते. एवढ्यात भगवंताने सांगितले, आता आपणास पंढरपूरला जावयाचे आहे. असे म्हटल्यावर सर्वांनी कठिण अंतकरणाने ज्ञानदेवांच्या समाधिला प्रदक्षिणा घातली व सर्वांनी नमस्कार केला. सर्व मंडळी बाहेर पडले माउलींच्या नावाचा जयजयकार केला.
इंद्रायणी काठी देवाची आळंदी ! लागली समाधी ज्ञानेशाची !

Friday, 25 November 2016

इंद्रायणी काठी देवाची आळंदी ! लागली समाधी ज्ञानेशाची !


 इंद्रायणी काठी देवाची आळंदी ! लागली समाधी ज्ञानेशाची !

ज्ञानियाचा राजा भोगतो जाणीव, नाचती वैष्णव मागे पुढे मागे पुढे ॥
मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे ॥
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६,वार, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.
श्री क्षेत्र आळंदीतील कार्य संपविल्यानंतर माउलींना तिर्थयात्रा करूशी वाटली.तेव्हा त्यांना आपल्याबरोबर संत नामदेव महाराज असावो म्हणून त्यांना घेण्याकरत माउली पंढरपूरला गेले. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले-नामदेव महाराज, भगवंताच्या आज्ञेनुसार, नामदेव महाराज तिर्थयात्रा करण्यासाठी निघाले.ते आपली आत्मचर्चा करीत सर्व तिर्थक्षेत्रे पाहिली नंतर पंढरपूरला  परत आले.
तीर्थे करोनी नामा पंढरीये आला, जिवलगा भेटला विठोबासी !
सदगदीत कंठ वोसंडला नयनी, घातला लोळणी चरणावरी !!
नामदेव महाराज पंढरपूरला आल्यानंतर संत नामदेवांनी पंढरीच्या विठूराया चरणी आपले मस्तक ठेवले. आपला जिवलग आपल्याला भेटला या भावनेने त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले एवढी परमभक्ती इश्वरावर संत नामदेवांची होती.त्यानंतर संत नामदेवांनी माउलींसाठी मोठ्या थाटा माटात मावंदे घातले.त्यानंतर माउलींनी आपले इहलोकीचे कार्य संपले असून त्यांना पांडूरंग चरणी मिठी मारून पांडूरंगाला म्हणाले, मी आपली परवानगी घ्यायला आलो. मला तुमच्या चरणाजवळ समाधी घ्यावयाची आहे.
ज्ञानदेवो म्हणे  विठ्ठलाशी, समाधान तुंचि होसी !   परि समाधि हे तुजपासी, घेईन देवो !
संत नामदेव महाराज तेव्हा ज्ञानदेवांचे हे वचन ऐकून भगवंत म्हणाले, ज्ञानदेवा येथे तुम्हाला समाधी घेता येणार नाही, तर तुम्हाला पुण्यवचन असणारी  जी अलंकापूरी आहे तेथेच समाधी घ्यावी लागेल. अशा प्रकारे संत ज्ञानदेवांना भगवंतांकडून वचन मिळाले त्याचे नामदेवांनी खालिलप्रमाणे वर्णन केले.
कैलासाचा वास अधिक सिद्धबेट, विष्णूचें वैकूंठ पुरातन,
देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि, येथेच समाधी ज्ञानदेवा,
या ठिकाणी ज्ञानदेवांनी १०८ वेळा समाधी घेतली आहे. असे हे स्थळ सकळ सिद्ध आणि अनादि आहे.
धन्य धन्य ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधि स्थिरा,
कृष्णपक्षी तुज निर्धारा, भेट देत जाईन !
कार्तिक मास शुद्ध एकादशी, पंढरीयात्रा होईल सरिशी !
यानुसार, सर्व संतमंडळी दिंड्या पताका घेउन खिन्न मनाने खेद करत अलंकापूरीत निघाले.
निवृत्तीनाथ महाराज पण त्यांचाही कंठ दाटून आला.सोपान, मुक्ता, यांना तर रडूच कोसळले,नामदेव महाराजांच्या शोकास तर पारावारच राहिला नाही. त्याचप्रमाणे नारा, विठा, गोंदा, महादा आदीकरून संत मंडळींना फार वाईट वाटले. व ते खेद करत सर्व इंद्रायणीच्या तीरी आले.त्यात सर्वात पुढे नारा विठा चालत होते. मग
सकळही भक्त मेळी  सहित वनमाळी, बैसले तये पाळी  इंद्रायणीचे,
नारा विठा पुढे चाले, ऐसे इंद्रायणीस आले, सौदंडीवृक्षातळी बैसले,
अशा प्रकारे सर्व भक्तमंडळी सौदंडीच्या झाडाखाली बसले.माउली आता समाधी घेणार म्हणून सर्वांनाच खेद वाटत होता.नामदेव महाराजा विषयी तर बोलायलाच नको.
यानंतर सर्व संत मंडळी सौदंडीच्या झाडाखालून उठून जुनाट असे पवित्र शिवपीठ येथे आले व नारा विठा गोंदा महादा यांना तुळशी  बेल फुले भागिरथीचे पवित्र पाणी आणण्यास सांगितले.
नारा विठा गोंदा पाठविला महादा, साहित्य गोविंदा सांगितले,
तुळशी आणि बेल दर्भ आणि फुले,
उदक हे चांगले भागिरथीचे... कासाविस प्राण मन तळमळी,
जैसी का मासोळी जीवनाविण....!
अशा त-हेने एकीकडे माउलींच्या समाधिची तयारी होत होती तर दुसरीकडे उपस्थीतांचं कंठ दाटून येत होते.पाण्यातील मासा ज्याप्रमाणे  पाण्याविना तळमळतो त्याप्रमाणे माउली आपल्यात यापुढे नाहित या भावनेने समस्त उपस्थित जनसमुदायाचे हृदय हेलावून गेले प्रत्येकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावू लागल्या.त्यावेळी स्वता माउली उपस्थीतांना म्हणाले,तुम्ही जर असे करू लागले तर समाधिला उशिर होईल. देव म्हणे असे
आठवाल फार,लागे उशिर समाधीसी...
असे म्हणून त्यांननी सिद्धेश्वरा समोरिल नंदी बाजूला सारून पूर्वीचे समाधीचे जुनाट स्थान दाखविले.
अष्टोतरशे वेळ समाधि निश्चळ, पूर्वी तुझे वहनाखाली,
उठविला नंदी पाहिली जुनाट, उघडिली शिळा विवराची,
बा माझी समाधि पहिली जुनाट, केवळ वैकुंठ गुह्यगोप्य,
नामा म्हणे देवा पुरातन स्थान,ऐसे नारायणे दावियेले....
नामदेव महाराज म्हणतात,हे जुनाट स्थान माउलींनी आम्हाला दाखविले हे पाहून नारा विठा गोंदा महादा यांना समाधिची जागा स्वच्छ करावयास सांगितली.
नारा विठा गोंदा महादा पाठविला, झाडविली जागा समाधिची...
नंतर हे सर्व वर आले यावेळी माउलींची सर्वांनी शोडषोपचारे पूजा केली व कंठ वाटून येउन सर्वांच्या तोंडून एकच उद्गार बाहेर आले.
पूर्वी अनंत भक्त जाले,पुढे ही भविष्य बोलिले, परि निवृत्ती ज्ञानदेवे सोडविले,
अपार जीवजंतु, नामा म्हणे भेटा लहान थोर सारे, जातो ज्ञानेश्वर समाधिसी..
 नामदेव महाराजांनी सर्वांना सांगितले की तुम्ही सर्वजण भेटा माउली समाधिकडे जात आहेत.सर्व भेटल्यानंतर निवृत्तीनाथ व भगवंतनाने  एका एका हाताला धरून माउलींना समाधि स्थानावर वसविण्याकरता चालले.
देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधिसी..
ज्ञानदेव आता आसनावर जावून बसले व भक्त मंडळींनी त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवली.नंतर भगवंताने ज्ञानदेवांच्या मस्तकावर हात  ठेवला नंतर दर्शन घेतले.त्यावर देव पुढे म्हणाले हे पहा जोपर्यंत चंद्र सुर्य आहेत माउलींची समाधि तोपर्यंत स्थिर राहिल.
जाउनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरि,  पुढे ज्ञानेश्वरी ठेवियेली,
हस्त ठेविला माथया, ज्ञानदेव लागे पाया,
माउलींनी तिन वेळेस आता नमस्कार करून डोळे झाकले. त्यावेळी त्यांची अवस्था काय झाली हे वर्णन करणे कठिण.अशा परिस्थितीतही भगवंतांनी सर्वांना कठिण अंतकरणाने बाहेर आणले व त्यास शिळा बसविली.
तीन वेळा जेव्हा जोडिले करकमळ, झाकियेले डोळे ज्ञानदेवे,
नामा म्हणे आता लोपला दिनकर ,बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ...
माउलींनी समाधी घेतल्यानंतर या भक्त मंडळींनी काय अवस्था झाली हे नामदेव महाराज वर्णन करतात.जे प्रवृत्तीवर कधी न येणारे  असे निवृत्तीनाथ महाराज यांचीअवस्था काय झाली.
वोसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला, आणिकाच्या डोळा अश्रु येती,
 भगवंताने देखील आपले मन पुष्कळ आवरले पण नाईलाज झाला.भगवंताच्या डोळ्याला देखिल अश्रु आले.त्यावेळी रखुमाई म्हणाल्या हो आतापर्यंत पुष्कळसे गेले त्याबद्दल खेद केला नाही.कित्येक जन्माला आलेत त्याबद्दल आनंदही नाही. तर आज हे काय त्यावेळेसे  देव रूक्मिणीला म्हणतात की रूक्मिणी मी हा एक योगी डोळ्याने पाहिला आहे आणि त्रैलोक्याचे हेच एक जीवन आहे.
देवो म्हणीती रूक्मिणी, हा येचि युगी देखील नयनी,
हेचि ज्ञान संजिवनी,जाण त्रिलोक्यासी.
भगवंत आता पर्यंत कोणाकरिताही रडले नाही परंतु माउलींच्या समाधिचे वेळी प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.तेवढ्यात नामदेव  महाराज पुढे आले व भगवंताला म्हणाले माउली सोडून गेले त्यासाठी माझा जीव कासावीस होत आहे.
मग प्रश्न आदरिला, नामा स्फुदो जो लागला,
कागा ज़ानदेवी गेला, मज सांडोनिया.
 भगवंत नामदेवांची सजूत घालू लागले. असे नामदेवा रडू नकोस ते कोण होते त्याची तुला कल्पना नाही.
ज्ञानदेव ज्ञान सागरू, ज्ञानदेव ज्ञान गूरू, ज्ञानदेव भवसिंधु तारू, प्रत्यक्ष रूपे असे...
अशाप्रकारे सर्वच मंडळी शोक करत होते. एवढ्यात भगवंताने सांगितले आता आपणास पंढरपूरला जावयाचे आहे असे म्हटल्यावर  सर्वांनी कठिण अंतकरणाने ज्ञानदेवांच्या समाधिला प्रदक्षिणा घातली व सर्वांनी नमस्कार केला. सह मंडळी सारे उठले ऋषिश्वर,केला नमस्कार समाधिशी...
सर्व मंडळी बाहेर पडले माउलींच्या नावाचा जयजयकार केला.
 वैष्णवांचे भार निघाले बाहेर, केला जयजयकार सर्वांनी.
नामा म्हणे आता लोपला दिनकर ,बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ...!


Wednesday, 23 November 2016

‘याची देही याची डोळा, भोगु मुक्तीचा सोहळा’

 ‘याची देही याची डोळा, भोगु मुक्तीचा सोहळा’

 संत ज्ञानेश्‍वर महाराज संजिवन समाधी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी तीन दिवसांपासूनच आळंदीत दाखल झाले आहेत. ठिक- ठिकाणी संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त हरिणाम सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. यात श्री  विठ्ठल बाबा देशमुख वारकरी शिक्षण संस्थेत रविवार (ता.२०)पासून सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी काकडा, दुपारी संगित भजन, सायंकाळी हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरि किर्तन होणार आहे. यात गाथामुर्ती रामभाऊ महाराज राऊत, नारायन महाराज जाधव, गुरू निवृत्ती महाराज वक्ते, माऊली महाराज कदम, मनिषानंद महाराज पुरी(मानवतकर), जगन्नाथ महाराज पाटील, विनोदाचार्य, बाबासाहेब महाराज इंगळे(बिड), विवेकानंद महाराज मिसाळ, जयवंत महाराज बोधले(नाशिक), पुंडलिक महाराज शास्री(नगर) आदिंचे हरि किर्तन होणार आहेत. रविवारी (ता.२७) रोजी विठ्ठल बाबा महाराज यांचे शिष्य श्री श्रीनिवास महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सप्ताहची सांगता होणार असल्याचे सोपान महाराज सानप शास्री हिंगोलीकर, श्रीनिवास महाराज घुगे यांनी सांगितले. दरम्यान, प्रदक्षिणा मार्गासह इंद्रायणीचे दोन्ही घाट गर्दीने फुलून गेले आहेत. रात्रंदिन चालणारा टाळ-मृदंगाचा गजर आणि माउली नामाचा अखंड जयघोष यामुळे अवघी अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन गेली आहे. घराण्यात परंपरेने चालत आलेली वारी माऊलीचरणी समर्पित करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा मेळा आळंदीत जमला आहे. टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘ज्ञानोबा माउली- तुकाराम’चा अखंड जयघोष कानी पडत आहे. गोपाळपुरा, प्रदक्षिणा रस्ता, इंद्रायणी घाट गर्दीने फुलून गेला असून भल्या पहाटे इंद्रायणीवर स्नानासाठी गर्दी जमली होती. इंद्रायणीला मुबलक पाणी असल्याने भाविकांची चांगली सोय झाली आहे. स्नानानंतर भाविकांची पावले माउलींच्या समाधी दर्शनासाठी वळत होती. सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी राहुट्यांमधून वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाचा निनाद आणि हरिनामाचा गजर, ज्ञानेश्वरी पारायण सुरू आहे. वैष्णवांच्या या अलोट गर्दीने संपूर्ण इंद्रायणीकाठचा परिसर गजबजून गेला असून वारकऱ्यांचे खेळ रंगले आहे. घाटावर विविध दिंड्या भजन, भारूड, माउलींचा जयघोष करीत होत्या. भक्तिरसात तल्लीन झालेले महिला, पुरुष वारकरी आनंदाने हातात हात घेत फुगड्या खेळत आहेत. पुंडलिक मंदिर परिसरही भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला आहे. शहरात ठिकठिकाणी अन्नदान, चहावाटप करण्यात येत आहे. ‘याची देही याची डोळा, भोगु मुक्तीचा सोहळा’ अनुभवण्यासाठी वारकरी आळंदीत दाखल झाला आहेत. 

जो जे वांच्छि तो तें लाहो । प्राणिजात ॥

जो जे वांच्छि तो तें लाहो । प्राणिजात ॥ 

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा 2017



ज्ञानेश्वर,ज्ञानेश्वर,ज्ञानेश्वर,ज्ञानेश्वर।
सुखी म्हणता चुकतील फेरे ॥
जन्म नाही रे आणखी । तुका म्हणे माझी भाक ॥

संत ज्ञानेश्वर मगाराड यांचा जन्म : इ.स. १२७५  आणि  समाधी : इ.स. १२९६) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक. योगी व तत्त्वज्ञ म्हणुन आजही  माऊलींची ख्याती आहे. भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी), अमृतानुभाव, चांगदेवपासष्टी व हरिपाठाचे अभंग ही त्यांची काव्यरचना आहे. अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाविषयक विचार मराठीतूनही व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथकर्तृत्वातून निर्माण केला. त्यामुळे समाजातील सर्व थरांतील लोकांना आध्यात्मिक लोकशाहीची प्रेरणा मिळाली.
ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव (आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. ) येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी  झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होत. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी होत. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांचा जन्म अनुक्रमे शके ११९५, ११९९ व १२०१ मध्ये झाला. ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात विरक्त संन्यासी होते. विवाहित असतानाच त्यांनी संन्यास घेतला व ते काशीला गेले. गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर गुऊंनी त्यांना परत पाठवले. त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर विठ्ठलपंतांना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे होत.

संत नामदेवांच्या जोडीने त्यांनी भागवत धर्म - वारकरी संप्रदायाचा प्रसार केला. ७०० वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाचे अनुयायी  मराठवाडा, विदर्भ, खानदेशसह सबंद्ध महाराष्ट्रात आजही लाखो संख्येने माऊलींच्या दर्शमासाठी अनुयायी दर्शनासाठी आळंदीत येतात. भावार्थदीपिका हे भगवद्गीतेच्या अनुवादवजा टीका ग्रंथाचे कार्य ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे केले. संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांचा मराठी संस्कृतीवर असलेला प्रभाव आजही अबाधित आहे.

निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या गुरूंच्या कृपाशीर्वादाने गीतेवर त्यांनी प्रख्यात टीका लिहिली. खरे पाहता ज्ञानेश्वरांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी लिहिली. या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. हे मराठी वाङ्मयाचे देशीकार लेणे झाले. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले. माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० (शके १२१२)मध्ये लिहिला गेला आहे. त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब‘ह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या (दहा प्रकरणे) या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे.

‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. चांगदेव हे महान योगी १४०० वर्षे जगले असे मानले जाते. पण त्‍यांचा अहंकार गेला नव्हता. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी उपदेशपर लिहिलेले ६५ ओव्यांचे पत्र म्हणजे चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. यात अद्वैतसिद्धान्ताचे अप्रतिम दर्शन आहे. संत ज्ञानेश्वरांचा ‘हरिपाठ’ (अभंगात्मक,२८ अभंग) हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे.
‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दुःख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह - या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय । एका जनार्दनीं पाय वंदितसे

‘जो जे वांछील, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्‍न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारिक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित  केली. व त्या समानतेच्य़ा मार्गाने जाण्याचा संदेश तुम्हा- आम्हाला दिला. तोच संदेश आज आपन आंगिकारणे गरजेचे आहे. तरच हा देश, हा महाराष्ट्र सुखी समाधानी लाहील यात शंका नाही...
                                                                                                                          

Thursday, 21 January 2016

थिरुवल्लुवर" ही पाच हजार वर्षांपूर्वी लिहिली गेलेली तामिळ संहिता आहे.. मानवी वर्तणुकीवरचे हे एवढे जुने शास्त्र, पण त्यातील तत्वे आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही जशास तशी लागू होतात.

विचार करावा अशा काही बहुमोल गोष्टी ....

1. तुमचे मूल तुमच्याशी नेहमी खोटे बोलते याचा अर्थ  त्याच्या प्रत्येक चुकीच्या वागण्यावरची तुमची प्रतिक्रिया अतिशय कठोर असते..

2. तुमच्या मुलाला तुमच्याशी मनातले सर्व बोलायला, मन मोकळे करायला तुम्ही नाही शिकवू शकलात तर तुमचे मूल तुमच्या हातातून गेले असे समजा..

3. तुमचे मूल कोणासमोरही अनावश्यक पणे दडपून जात असेल, नको तिथे एखाद्याचे वर्चस्व स्वीकारून त्याच्या अपेक्षेनुसार वागत असेल,  तर समजा की तुमच्या मुलामध्ये आत्मप्रतिष्ठेची कमतरता आहे आणि त्याचे कारण तुम्ही त्याला प्रोत्साहन कमी आणि सल्लेच जास्त देता..

4. कधी कधी आपले योग्य असूनसुद्धा जग आपल्याला चूक ठरवते; अशा वेळी ठाम राहून स्वतःच्या भूमिकेचे समर्थन करता आले पाहिजे. तुमचे मूल इथे कमी पडत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याला सर्वांच्या देखत शिस्त लावायचा सातत्याने प्रयत्न केला आहे..

5. तुमचे मूल दुसर्‍यांच्या वस्तू घेते याचा अर्थ त्याच्यासाठी तुम्ही वस्तू तर घेता कदाचित पण त्याला ती वस्तु स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य देत नाही..

6. तुमचे मूल भित्रे आहे कारण तुम्ही नेहमी  जरा जास्तच तत्परतेने त्याच्या मदतीला धावून जाता..

7. तुमचे मूल इतरांच्या भावनांचा अनादर करते याचा अर्थ तुम्ही त्याच्याशी संवाद साधण्याऐवजी सतत सूचना करत राहता आणि त्याच्या वागण्या बोलण्याचे नियंत्रण कायम स्वतःकडे ठेवता, त्यावर नेहमी अधिकार  गाजवत राहता..

8. तुमच्या मुलाला फार पटकन राग येतो याचा अर्थ त्याच्या चुकीच्या वागण्याकडे तर तुमचे प्रचंड  लक्ष असते पण त्या मानाने त्याच्या चांगल्या वागण्याची तुम्ही आजिबात दखल घेत नाही..

9. तुमच्या मुलाला इतर कुणाबद्दल असूया आहे याचा अर्थ त्याने एखादे काम यशस्वी पणे पूर्ण केले तरच तुम्ही त्याचे कौतुक करता; मात्र त्याने त्याच्या धडपडी दरम्यान स्वतःमध्ये पूर्वीच्या मानाने नक्कीच काही सुधारणा केलेल्या असतात - भले ते काम त्याला तुमच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण करता आले नसेल पण अशा सुधारणांबद्दल तुम्ही त्याचे मोकळ्या मनाने कौतुक करू शकत नाही..

10. तुमचे मूल तुम्हाला मुद्दाम त्रास देते, खोड्या काढते, तुमच्या भावनांचा विचार न करता तुमच्या कामात व्यत्यय आणून असुरी आनंद मिळवायचा प्रयत्न करते याचा अर्थ तुमचे मूल म्हणून त्याला हवी असलेली शारिरिक जवळीक  व त्या आपुलकीच्या स्पर्शातून  व्यक्त होणारी तुमची माया कमी पडली आहे..

11. तुमचे मूल तुम्हाला मुळी जुमानतच नाही, अगदी उघडपणे तुम्हाला धुडकावून लावते, याचा अर्थ तुम्ही बर्‍याचदा नुसत्या पोकळ धमक्या देता पण त्याप्रमाणे कृती कधीच करत नाही..

12. तुमचे मूल तुमच्या पासून गोष्टी लपवते, तुम्हाला कळूच नये म्हणून प्रयत्न करते याचा अर्थ तुम्ही त्याला समजून घ्याल याचा त्याला विश्वास वाटत नाही उलट तुम्ही राईचा पर्वत करून आकांडतांडवच जास्त कराल याची त्याला खात्री आहे..

13.तुमचे मूल तुम्हाला उलटे बोलते, दुरुत्तरे करते कारण तुम्हांला त्याने इतरांशी असेच करताना अनेकदा पाहिले आहे; त्यामुळे त्यात काही गैर आहे असे त्याला अजिबात वाटत नाही..

14. तुमचे मूल तुमचे तर ऎकत नाहीच; उलट इतरांचे जास्त ऎकते आणि त्यांच्या सल्ल्यानुसार वागण्याचा प्रयत्न करते कारण तुम्ही फार पटकन निर्णय सांगून किंवा आपले मत देऊन मोकळे होता हे त्याला माहीत आहे..

15. तुमचे मूल तुमच्याशी बंडखोरी करते कारण त्याने हे पक्के ओळखलेले आहे की काय योग्य आहे यापेक्षाही लोक काय म्हणतील , हे तुमच्या लेखी जास्त महत्वाचे आहे..

थिरुवल्लुवर

थिरुवल्लुवर" ही पाच हजार वर्षांपूर्वी लिहिली गेलेली तामिळ संहिता आहे.. मानवी वर्तणुकीवरचे हे एवढे जुने शास्त्र, पण त्यातील तत्वे आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगातही जशास तशी लागू होतात.

विचार करावा अशा काही बहुमोल गोष्टी ....

1. तुमचे मूल तुमच्याशी नेहमी खोटे बोलते याचा अर्थ  त्याच्या प्रत्येक चुकीच्या वागण्यावरची तुमची प्रतिक्रिया अतिशय कठोर असते..

2. तुमच्या मुलाला तुमच्याशी मनातले सर्व बोलायला, मन मोकळे करायला तुम्ही नाही शिकवू शकलात तर तुमचे मूल तुमच्या हातातून गेले असे समजा..

3. तुमचे मूल कोणासमोरही अनावश्यक पणे दडपून जात असेल, नको तिथे एखाद्याचे वर्चस्व स्वीकारून त्याच्या अपेक्षेनुसार वागत असेल,  तर समजा की तुमच्या मुलामध्ये आत्मप्रतिष्ठेची कमतरता आहे आणि त्याचे कारण तुम्ही त्याला प्रोत्साहन कमी आणि सल्लेच जास्त देता..

4. कधी कधी आपले योग्य असूनसुद्धा जग आपल्याला चूक ठरवते; अशा वेळी ठाम राहून स्वतःच्या भूमिकेचे समर्थन करता आले पाहिजे. तुमचे मूल इथे कमी पडत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याला सर्वांच्या देखत शिस्त लावायचा सातत्याने प्रयत्न केला आहे..

5. तुमचे मूल दुसर्‍यांच्या वस्तू घेते याचा अर्थ त्याच्यासाठी तुम्ही वस्तू तर घेता कदाचित पण त्याला ती वस्तु स्वतः निवडण्याचे स्वातंत्र्य देत नाही..

6. तुमचे मूल भित्रे आहे कारण तुम्ही नेहमी  जरा जास्तच तत्परतेने त्याच्या मदतीला धावून जाता..

7. तुमचे मूल इतरांच्या भावनांचा अनादर करते याचा अर्थ तुम्ही त्याच्याशी संवाद साधण्याऐवजी सतत सूचना करत राहता आणि त्याच्या वागण्या बोलण्याचे नियंत्रण कायम स्वतःकडे ठेवता, त्यावर नेहमी अधिकार  गाजवत राहता..

8. तुमच्या मुलाला फार पटकन राग येतो याचा अर्थ त्याच्या चुकीच्या वागण्याकडे तर तुमचे प्रचंड  लक्ष असते पण त्या मानाने त्याच्या चांगल्या वागण्याची तुम्ही आजिबात दखल घेत नाही..

9. तुमच्या मुलाला इतर कुणाबद्दल असूया आहे याचा अर्थ त्याने एखादे काम यशस्वी पणे पूर्ण केले तरच तुम्ही त्याचे कौतुक करता; मात्र त्याने त्याच्या धडपडी दरम्यान स्वतःमध्ये पूर्वीच्या मानाने नक्कीच काही सुधारणा केलेल्या असतात - भले ते काम त्याला तुमच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण करता आले नसेल पण अशा सुधारणांबद्दल तुम्ही त्याचे मोकळ्या मनाने कौतुक करू शकत नाही..

10. तुमचे मूल तुम्हाला मुद्दाम त्रास देते, खोड्या काढते, तुमच्या भावनांचा विचार न करता तुमच्या कामात व्यत्यय आणून असुरी आनंद मिळवायचा प्रयत्न करते याचा अर्थ तुमचे मूल म्हणून त्याला हवी असलेली शारिरिक जवळीक  व त्या आपुलकीच्या स्पर्शातून  व्यक्त होणारी तुमची माया कमी पडली आहे..

11. तुमचे मूल तुम्हाला मुळी जुमानतच नाही, अगदी उघडपणे तुम्हाला धुडकावून लावते, याचा अर्थ तुम्ही बर्‍याचदा नुसत्या पोकळ धमक्या देता पण त्याप्रमाणे कृती कधीच करत नाही..

12. तुमचे मूल तुमच्या पासून गोष्टी लपवते, तुम्हाला कळूच नये म्हणून प्रयत्न करते याचा अर्थ तुम्ही त्याला समजून घ्याल याचा त्याला विश्वास वाटत नाही उलट तुम्ही राईचा पर्वत करून आकांडतांडवच जास्त कराल याची त्याला खात्री आहे..

13.तुमचे मूल तुम्हाला उलटे बोलते, दुरुत्तरे करते कारण तुम्हांला त्याने इतरांशी असेच करताना अनेकदा पाहिले आहे; त्यामुळे त्यात काही गैर आहे असे त्याला अजिबात वाटत नाही..

14. तुमचे मूल तुमचे तर ऎकत नाहीच; उलट इतरांचे जास्त ऎकते आणि त्यांच्या सल्ल्यानुसार वागण्याचा प्रयत्न करते कारण तुम्ही फार पटकन निर्णय सांगून किंवा आपले मत देऊन मोकळे होता हे त्याला माहीत आहे..

15. तुमचे मूल तुमच्याशी बंडखोरी करते कारण त्याने हे पक्के ओळखलेले आहे की काय योग्य आहे यापेक्षाही लोक काय म्हणतील , हे तुमच्या लेखी जास्त महत्वाचे आहे..

दुष्काळग्रस्तांवर संक्रांत...

दुष्काळग्रस्तांवर संक्रांत...
दुष्काळात होरपळणा-या शेतक-यांची महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा क्रूर थट्टा केली असून दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या मदतीसाठी मंजूर केलेल्या पुरवणी मागण्यांमध्ये थेट ५० टक्के कपात केली आहे. नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने शेतक-यांच्या मदतीसाठी ४ हजार २८२ कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या होत्या. मात्र एकूणच पुरवणी मागण्यांमध्ये ५० टक्के कपात केल्याने आता हा निधी थेट दोन हजार कोटींनी कमी होणार आहे. दुष्काळात हवालदिल झालेल्या शेतक-यांवर ही जणून संक्रांतच आली आहे.
राज्यात चौथ्या वर्षी दुष्काळाने थैमान घातले आहे. हवालदिल झालेल्या शेतक-यांच्या आत्महत्यांच्या बातम्या रोज कानावर येऊन आदळत आहेत. अशा वेळी सरकार शेतक-यांच्या पाठीशी आहे, असा सकारात्मक संदेश जाण्याची गरज असताना राज्य सरकारने दुष्काळ निवारणाच्या निधीत थेट पन्नास टक्के कपात करून शेतक-यांच्या दु:खावर मीठच चोळले आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने २०१५-१६च्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतल्या होत्या.
त्या पुरवणी मागण्यांमध्ये बाब क्र.३५मध्ये शेतक-यांना मदत देण्यासाठी ४ हजार २८२ कोटी मंजूर करून घेतले होते. तसेच आपत्कालीन पाणीपुरवठय़ासाठी १५० कोटींच्या निधीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. असे असताना राज्य सरकारने १२ जानेवारी रोजी वित्त विभागाने एक शासन निर्णय जारी केला आहे. त्या निर्णयात एकंदरीत कामांसाठीच्या निधीला कट लावण्यात आलेली असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये विशेषत: डिसेंबर,२०१५च्या पुरवणी मागण्यांच्या निधी वितरणाची मर्यादा ५० टक्के इतकीच राहील असे स्पष्ट सांगण्यात आले आहे.
याचाच अर्थ असा होतो की, डिसेंबरमध्ये ज्या संपूर्ण पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या आहेत, त्यामधील केवळ अर्धे पैसे वितरीत होतील आणि अध्रे पैसे वितरीत होणार नाही. यामध्ये शेतक-यांना मदत देण्यासाठी ४ हजार २८२ कोटी रुपये होते आणि आपत्कालीन पाणीपुरवठय़ासाठी १५० कोटी अशी मदत होती. या कपातीमुळे केवळ २ हजार १४८ कोटी रुपये एवढीच रक्कम दुष्काळ निवारणासाठी मिळणार आहे. दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असताना सरकारने निधीमध्ये कपात करून हवालदिल शेतक-यांना मोठा धक्का दिला आहे. आत्महत्याग्रस्त भागातील शेतक-यांना दिलासा देण्याऐवजी सरकारने कपातीचा निर्णय घेतल्याने तेथील लोकांमध्ये निराशेची भावना वाढीस लागण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मी तिरंगा बोलतोय...


मी तिरंगा बोलतोय...

प्रिय भारतवासीयांनो, 
मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. बावीस जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी पंडित नेहरू यांनी केलेले भाषण अतिशय मार्मिक असे होते. घटना समितीच्या सदस्यांसमोर मला पेश करण्यात आले ते रेशमी खादी आणि सुती खादीमध्ये. त्यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून भारताचा राष्ट्रध्वज म्हणून माझा स्वीकार केला.
यापूर्वी २३ जून १९४७ ला माझे स्वरूप ठरविण्यासंदर्भात तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. डॉ. राजेंद्रप्रसाद त्याचे अध्यक्ष होते. समितीत मौलाना अबूल कलाम आझाद, के. एम. पणिक्कर, श्रीमती सरोजिनी नायडू, के. एम. मुन्शी, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. यावेळी सविस्तर चर्चा करून माझे स्वरूप ठरविण्यात आले. माझा रंग, रूप, आकार, मान-सन्मान, फडकावण्याचे निकष आदी ठरविण्यात आले. यासंदर्भात १८ जुलै १९४७ ला अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानंतर घटना समितीत त्याला मान्यता मिळावी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना तो सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी तो सादर केला. 
स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपली आहूती देणार्‍यांमुळेच माझा जन्म झाला. चौदा ऑगस्ट १९४७ ला रात्री पावणेदहा वाजता कौन्सिल हाऊसवर सुचेता कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमच्या गायनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद व पं. जवाहरलाल नेहरू यांची भाषणे झाली. त्यानंतर हंसाबेन मेहता यांनी अध्यक्ष राजेंद्रप्रसाद यांना माझे सिल्कमधील रूप दिले आणि त्यांना सांगितले, की स्वतंत्र भारतात या सदनात जो राष्ट्रध्वज फडकावला जाईल तो भारतीय महिलांकडून देशाला दिलेली भेट असेल. सर्व लोकांसमोर पहिल्यांदा मला सादर करण्यात आले होते. सारे जहॉं से अच्छा आणि जन गण मन यांच्या सामूहिक गायनानंतर हा कार्यक्रम संपला. 
माझ्या संदर्भातील तयार केलेले नियम तुम्हाला माहित हवेत. ते आता सांगतो. भारताचा राष्ट्रध्वज समतल तिरंगा असेल. त्याचा आकार आयाताकार असून त्याची लांबी व रूंदीचे प्रमाण 2:३ असे राहील. तीन रंगांच्या पट्ट्या सरळ असतील. सर्वांत वर केशरी, मध्ये पाढंरा आणि खाली हिरव्या रंगाची पट्टी असेल. पांढर्‍या रंगाच्या पट्टीवर मध्ये सारनाथ येथील अशोकस्तंभावरील चोवीस आर्‍या असणारे चक्र असेल. त्याचा व्यास पांढर्‍या रंगाच्या पट्टीच्या रूंदीएवढा असेल.
मला तयार करण्यासाठी तयार करण्यासाठीचे वस्त्र खादीचे असेल. सूती, रेशमी वस्त्रही चालेल. पण हे सूत हाताने कातले पाहिजे. चरख्याचा वापर येथे अपेक्षित आहे. शिवण्यासाठी केवळ खादीच्या धाग्यांचा उपयोग होईल. नियमानुसार माझ्यासाठी खादीचा एक वर्ग फूट कपड्याचे वजन २०५ ग्रॅम व्हायला हवे. 
माझ्यासाठी हाताने तयार केलेल्या खादीचे उत्पादन स्वातंत्र्य सेनानींच्या गरग नावाच्या गावत केले जाते. उत्तर कर्नाटक जिल्ह्यात बंगळूर- पुणे रस्त्यावर हे गाव आहे. येथे या केंद्राची स्थापना १९५४ मध्ये करण्यात आली. मात्र, आता शहाजानपूर येथील ऑर्डिनेन्स क्योरिंग फॅक्टरी, खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई व खादी ग्रामोद्योग आयोग दिल्ली येथेही माझे उत्पादन होऊ लागले आहे. माझी निर्मिती खासगी तत्वावरही होऊ शकतो. मात्र, माझा मानसन्मान राखला गेला पाहिजे. त्यासाठी आयएसआय मार्क हवा.
माझ्यातील रंगांचे स्वरूप स्पष्ट आहे. केशरी रंग साहस आणि बलिदानाचे, पांढरा सत्य आणि शांतीचे आणि हिरवा रंग श्रद्धा आणि शौर्याचे प्रतीक आहे. चोवीस आर्‍याचे निळ्या रंगाचे चक्र २४ तास सतत प्रगतीचे प्रतीक आहे. प्रगतीही कशी तर निळ्या अनंत आकाशासारखी किंवा निळ्या अथांग सागरासारखी.