Friday, 25 November 2016

इंद्रायणी काठी देवाची आळंदी ! लागली समाधी ज्ञानेशाची !


 इंद्रायणी काठी देवाची आळंदी ! लागली समाधी ज्ञानेशाची !

ज्ञानियाचा राजा भोगतो जाणीव, नाचती वैष्णव मागे पुढे मागे पुढे ॥
मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड कैवल्याचे ॥
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६,वार, गुरुवार). हा ‘ज्ञानसूर्य’ मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.
श्री क्षेत्र आळंदीतील कार्य संपविल्यानंतर माउलींना तिर्थयात्रा करूशी वाटली.तेव्हा त्यांना आपल्याबरोबर संत नामदेव महाराज असावो म्हणून त्यांना घेण्याकरत माउली पंढरपूरला गेले. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले-नामदेव महाराज, भगवंताच्या आज्ञेनुसार, नामदेव महाराज तिर्थयात्रा करण्यासाठी निघाले.ते आपली आत्मचर्चा करीत सर्व तिर्थक्षेत्रे पाहिली नंतर पंढरपूरला  परत आले.
तीर्थे करोनी नामा पंढरीये आला, जिवलगा भेटला विठोबासी !
सदगदीत कंठ वोसंडला नयनी, घातला लोळणी चरणावरी !!
नामदेव महाराज पंढरपूरला आल्यानंतर संत नामदेवांनी पंढरीच्या विठूराया चरणी आपले मस्तक ठेवले. आपला जिवलग आपल्याला भेटला या भावनेने त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले एवढी परमभक्ती इश्वरावर संत नामदेवांची होती.त्यानंतर संत नामदेवांनी माउलींसाठी मोठ्या थाटा माटात मावंदे घातले.त्यानंतर माउलींनी आपले इहलोकीचे कार्य संपले असून त्यांना पांडूरंग चरणी मिठी मारून पांडूरंगाला म्हणाले, मी आपली परवानगी घ्यायला आलो. मला तुमच्या चरणाजवळ समाधी घ्यावयाची आहे.
ज्ञानदेवो म्हणे  विठ्ठलाशी, समाधान तुंचि होसी !   परि समाधि हे तुजपासी, घेईन देवो !
संत नामदेव महाराज तेव्हा ज्ञानदेवांचे हे वचन ऐकून भगवंत म्हणाले, ज्ञानदेवा येथे तुम्हाला समाधी घेता येणार नाही, तर तुम्हाला पुण्यवचन असणारी  जी अलंकापूरी आहे तेथेच समाधी घ्यावी लागेल. अशा प्रकारे संत ज्ञानदेवांना भगवंतांकडून वचन मिळाले त्याचे नामदेवांनी खालिलप्रमाणे वर्णन केले.
कैलासाचा वास अधिक सिद्धबेट, विष्णूचें वैकूंठ पुरातन,
देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि, येथेच समाधी ज्ञानदेवा,
या ठिकाणी ज्ञानदेवांनी १०८ वेळा समाधी घेतली आहे. असे हे स्थळ सकळ सिद्ध आणि अनादि आहे.
धन्य धन्य ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधि स्थिरा,
कृष्णपक्षी तुज निर्धारा, भेट देत जाईन !
कार्तिक मास शुद्ध एकादशी, पंढरीयात्रा होईल सरिशी !
यानुसार, सर्व संतमंडळी दिंड्या पताका घेउन खिन्न मनाने खेद करत अलंकापूरीत निघाले.
निवृत्तीनाथ महाराज पण त्यांचाही कंठ दाटून आला.सोपान, मुक्ता, यांना तर रडूच कोसळले,नामदेव महाराजांच्या शोकास तर पारावारच राहिला नाही. त्याचप्रमाणे नारा, विठा, गोंदा, महादा आदीकरून संत मंडळींना फार वाईट वाटले. व ते खेद करत सर्व इंद्रायणीच्या तीरी आले.त्यात सर्वात पुढे नारा विठा चालत होते. मग
सकळही भक्त मेळी  सहित वनमाळी, बैसले तये पाळी  इंद्रायणीचे,
नारा विठा पुढे चाले, ऐसे इंद्रायणीस आले, सौदंडीवृक्षातळी बैसले,
अशा प्रकारे सर्व भक्तमंडळी सौदंडीच्या झाडाखाली बसले.माउली आता समाधी घेणार म्हणून सर्वांनाच खेद वाटत होता.नामदेव महाराजा विषयी तर बोलायलाच नको.
यानंतर सर्व संत मंडळी सौदंडीच्या झाडाखालून उठून जुनाट असे पवित्र शिवपीठ येथे आले व नारा विठा गोंदा महादा यांना तुळशी  बेल फुले भागिरथीचे पवित्र पाणी आणण्यास सांगितले.
नारा विठा गोंदा पाठविला महादा, साहित्य गोविंदा सांगितले,
तुळशी आणि बेल दर्भ आणि फुले,
उदक हे चांगले भागिरथीचे... कासाविस प्राण मन तळमळी,
जैसी का मासोळी जीवनाविण....!
अशा त-हेने एकीकडे माउलींच्या समाधिची तयारी होत होती तर दुसरीकडे उपस्थीतांचं कंठ दाटून येत होते.पाण्यातील मासा ज्याप्रमाणे  पाण्याविना तळमळतो त्याप्रमाणे माउली आपल्यात यापुढे नाहित या भावनेने समस्त उपस्थित जनसमुदायाचे हृदय हेलावून गेले प्रत्येकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावू लागल्या.त्यावेळी स्वता माउली उपस्थीतांना म्हणाले,तुम्ही जर असे करू लागले तर समाधिला उशिर होईल. देव म्हणे असे
आठवाल फार,लागे उशिर समाधीसी...
असे म्हणून त्यांननी सिद्धेश्वरा समोरिल नंदी बाजूला सारून पूर्वीचे समाधीचे जुनाट स्थान दाखविले.
अष्टोतरशे वेळ समाधि निश्चळ, पूर्वी तुझे वहनाखाली,
उठविला नंदी पाहिली जुनाट, उघडिली शिळा विवराची,
बा माझी समाधि पहिली जुनाट, केवळ वैकुंठ गुह्यगोप्य,
नामा म्हणे देवा पुरातन स्थान,ऐसे नारायणे दावियेले....
नामदेव महाराज म्हणतात,हे जुनाट स्थान माउलींनी आम्हाला दाखविले हे पाहून नारा विठा गोंदा महादा यांना समाधिची जागा स्वच्छ करावयास सांगितली.
नारा विठा गोंदा महादा पाठविला, झाडविली जागा समाधिची...
नंतर हे सर्व वर आले यावेळी माउलींची सर्वांनी शोडषोपचारे पूजा केली व कंठ वाटून येउन सर्वांच्या तोंडून एकच उद्गार बाहेर आले.
पूर्वी अनंत भक्त जाले,पुढे ही भविष्य बोलिले, परि निवृत्ती ज्ञानदेवे सोडविले,
अपार जीवजंतु, नामा म्हणे भेटा लहान थोर सारे, जातो ज्ञानेश्वर समाधिसी..
 नामदेव महाराजांनी सर्वांना सांगितले की तुम्ही सर्वजण भेटा माउली समाधिकडे जात आहेत.सर्व भेटल्यानंतर निवृत्तीनाथ व भगवंतनाने  एका एका हाताला धरून माउलींना समाधि स्थानावर वसविण्याकरता चालले.
देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधिसी..
ज्ञानदेव आता आसनावर जावून बसले व भक्त मंडळींनी त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवली.नंतर भगवंताने ज्ञानदेवांच्या मस्तकावर हात  ठेवला नंतर दर्शन घेतले.त्यावर देव पुढे म्हणाले हे पहा जोपर्यंत चंद्र सुर्य आहेत माउलींची समाधि तोपर्यंत स्थिर राहिल.
जाउनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरि,  पुढे ज्ञानेश्वरी ठेवियेली,
हस्त ठेविला माथया, ज्ञानदेव लागे पाया,
माउलींनी तिन वेळेस आता नमस्कार करून डोळे झाकले. त्यावेळी त्यांची अवस्था काय झाली हे वर्णन करणे कठिण.अशा परिस्थितीतही भगवंतांनी सर्वांना कठिण अंतकरणाने बाहेर आणले व त्यास शिळा बसविली.
तीन वेळा जेव्हा जोडिले करकमळ, झाकियेले डोळे ज्ञानदेवे,
नामा म्हणे आता लोपला दिनकर ,बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ...
माउलींनी समाधी घेतल्यानंतर या भक्त मंडळींनी काय अवस्था झाली हे नामदेव महाराज वर्णन करतात.जे प्रवृत्तीवर कधी न येणारे  असे निवृत्तीनाथ महाराज यांचीअवस्था काय झाली.
वोसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला, आणिकाच्या डोळा अश्रु येती,
 भगवंताने देखील आपले मन पुष्कळ आवरले पण नाईलाज झाला.भगवंताच्या डोळ्याला देखिल अश्रु आले.त्यावेळी रखुमाई म्हणाल्या हो आतापर्यंत पुष्कळसे गेले त्याबद्दल खेद केला नाही.कित्येक जन्माला आलेत त्याबद्दल आनंदही नाही. तर आज हे काय त्यावेळेसे  देव रूक्मिणीला म्हणतात की रूक्मिणी मी हा एक योगी डोळ्याने पाहिला आहे आणि त्रैलोक्याचे हेच एक जीवन आहे.
देवो म्हणीती रूक्मिणी, हा येचि युगी देखील नयनी,
हेचि ज्ञान संजिवनी,जाण त्रिलोक्यासी.
भगवंत आता पर्यंत कोणाकरिताही रडले नाही परंतु माउलींच्या समाधिचे वेळी प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.तेवढ्यात नामदेव  महाराज पुढे आले व भगवंताला म्हणाले माउली सोडून गेले त्यासाठी माझा जीव कासावीस होत आहे.
मग प्रश्न आदरिला, नामा स्फुदो जो लागला,
कागा ज़ानदेवी गेला, मज सांडोनिया.
 भगवंत नामदेवांची सजूत घालू लागले. असे नामदेवा रडू नकोस ते कोण होते त्याची तुला कल्पना नाही.
ज्ञानदेव ज्ञान सागरू, ज्ञानदेव ज्ञान गूरू, ज्ञानदेव भवसिंधु तारू, प्रत्यक्ष रूपे असे...
अशाप्रकारे सर्वच मंडळी शोक करत होते. एवढ्यात भगवंताने सांगितले आता आपणास पंढरपूरला जावयाचे आहे असे म्हटल्यावर  सर्वांनी कठिण अंतकरणाने ज्ञानदेवांच्या समाधिला प्रदक्षिणा घातली व सर्वांनी नमस्कार केला. सह मंडळी सारे उठले ऋषिश्वर,केला नमस्कार समाधिशी...
सर्व मंडळी बाहेर पडले माउलींच्या नावाचा जयजयकार केला.
 वैष्णवांचे भार निघाले बाहेर, केला जयजयकार सर्वांनी.
नामा म्हणे आता लोपला दिनकर ,बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ...!


No comments:

Post a Comment