Tuesday, 4 July 2017

मी पंढरीचा वारकरी...!!

मी पंढरीचा वारकरी...!!



पंढरीशी जारे आल्यानो संसारा,  दिनाचा सोयरा पांडुरंग !

वाट पाहे उभा भेटीशी आवडी,  कृपाळू तातडी उतावीळ !
ज्ञानेश्वरीमध्ये ‘वारी’ म्हणजे येरझारा. वारकरी संप्रदायात पंढरीच्या वारीला महत्त्व आहे. वर्षातून एकदा वारकऱ्याने पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घ्यावे; असा नियम आहे. गळ्यांत तुळशीमाळा, कपाळी बुक्का, कानाच्या दोन्ही पाळ्यांना गोपीचंदन, खांद्यावर पताका आणि हातात टाळ-मृदुंग अशा थाटात वारकरी वारीला जाताना दिसतात. पंढरपूरच्या वारीचा हा सोहळ. अभूतपूर्व असतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचे ते एक अंग आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांतून हा सोहळा चालतो. याचे नियोजन ज्ञानेश्वर संस्थानातर्फे केले जाते. दरवर्षी ज्येष्ठ वदय अष्टमीला आळंदीहून विधिपूर्वक पालखीचे प्रस्थान होते.

 आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपूरात तिचे आगमन होते. आषाढ पौर्णिमेपर्यंत पंढरपूरात माऊलीचा उत्सव असतो. आषाढ वद्य एकादशीला पालखीचा परतीचा प्रवास सुरू होऊन आषाढ वदय दशमीला पालखी आळंदीला परत येते. वारीच्या मध्यभागी ज्ञानदेव माऊलीच्या चांदीच्या पादुका ठेवलेला रथ असतो. रथापुढे मानाच्या सत्तावीस दिंड्या असतात. मान्यता मिळालेल्या अन्य दिंड्या रथाच्या मागे असतात अर्थात पहिली दिंडी माऊलीची असते. भजन कीर्तन करीत वारकरी मार्गस्थ होत असतात. 


वारीची ही एक पदयात्राच असते तिचा मार्ग ठरलेला, मुक्काम ठरलेले असतात. ठरावीक मुक्कामाच्या ठिकाणी, माऊलींच्या घोड्यांची रिंगणे होतात. पहिले उभे रिंगण ‘चांदोबाचा लिंब’ येथे, लोठांद- तरडगांव या मार्गावर होते. दुसरे गोल रिंगण ठाकूरबुवांच्या समाधीजवळ, भंडी -शेगाव या गावाजवळ खुडसफाटा येथे होते. वाखरी पंढरपूर या गावाजवळ शेवटची रिंगणे होतात. वाटेत माऊलीच्या पादुकांना नीरा नदीत स्नान व पौर्णिमेला स्नानानंतर विठ्ठल रखुमाई यांच्या चरणी भेट हा महत्त्वाचा कार्यक्रम असतो.
पंढरीच्या वारीची वैशिष्ट्ये :

दिंडी : प्रत्येक दिंडीमध्ये एक वीणेकरी एक पखवाज वादक असतो. दिंडीपुढे पताकाधारी वारकरी असतो.


रिंगण : वारीला पायी जाताना येणारा थकवा जाण्यासाठी एकूण सहा ठिकाणी रिंगण घातली जातात. 

कीर्तन : वारकरी संप्रदायातील कीर्तन परंपरेचे प्रवर्तक संत नामदेव मानले जतात. यापद्धतीत इतर कीर्तनासारखा पूर्वरंग, उत्तररंग, आख्यान असे काही नसते. या कीर्तनात सांप्रदायिक भजनाला प्राधान्य असते. कीर्तनात मृदुंग, टाळ, पखवाज व वीणा एवढी वाद्ये असतात. आणि देव, संत, नाममहात्म्य, गुरुकृपा असेच विषय असतात. सुरवातीला मागे टाळकरी उभे राहून ‘‘सुंदर ते ध्यान’’ हा अभंग म्हणून कीर्तन सुरू करतात. 



No comments:

Post a Comment