Saturday, 24 June 2017

सामाजिक एकतेचे दर्शन ‘पंढरीची वारी’


सामाजिक एकतेचे दर्शन ‘पंढरीची वारी’

संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा !!
जावे पंढरीशी आवडे मनाशी, कई एकादशी आषाढी ये !!

पंढरीच्या वारीला अनेक शतकांची प्रदीर्घ परंपरा आहे. ‘सकळासी येथे आहे अधिकार’ म्हणत वारकरी संतांनी अठरापगड जातीत विखुरलेला समाज विठ्ठलभक्तीच्या उदात्त अशा स्नेहधर्माने चंद्रभागेच्या वाळवंटी एक केला. एकत्र भजन, एकत्र स्वयंपाक, एकत्रित भोजन यामुळे वारकरी आचारधर्मात जाती-वर्णभेदाला स्थानच नाही. येथे जाती नव्हे तर भक्ती प्रमाण मानली गेली. तुका म्हणे नाही जातीसवे काम, ज्या मुखी नाम तोचि धन्य! हे संतवचन वारीतील सामाजिक समतेचे अधिष्ठान आहे. या दृष्टीने वारी म्हणजे समतेचे, समरसतेचे विराट दर्शन आहे. पंढरीची वारी हे सुकृत दर्शनी श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठलाच्या उपासनेचे भक्ती-ज्ञानाधिष्ठित व्रत आहे, पण या व्रताची या उपासनेची सामाजिक फलश्रुती विचारात घेता पंढरीची वारी हे सामाजिक समतेचे, एकतेचे आणि समरसतेचे विराट दर्शन आहे.
दरवरर्षी दिंडीत लाखो लोक पायी वारीत सामील होतात. आपले घरदार, कामधंदा सोडून ते पंढरीच्या वाटेवर येतात. हे का येत असावे असा प्रश्न लोक विचारतात. त्यांचेही बरोबर आहे. या दिंडीच्या वाटेवर ना चांगली राहण्याची व्यवस्था, ना झोपण्याची सोय, पण तरीही लक्षावधी जनांचा प्रवाहो एका विठ्ठल नामाच्या मंत्राने प्रवाहित होऊन चालत असतो. त्याच्या चालण्याला ग्यानबा-तुकारामचा ठेका असतो. टाळ- मृदुंगातून उमटणारा जय जय रामकृष्ण हरीचा गजर असतो, त्यामुळे कोणत्याही लौकिक सुविधांची पर्वा करायला त्याच्याकडे वेळच नसतो. वारकऱ्यांचे सारे लक्ष विठ्ठलनामात गुंतलेले असते आणि नामातून, भजनातून, कीर्तनातून मिळणारा आनंद फक्त त्याच्यापुरता नसतो, तर तो अवघ्या आसमंतात साठलेला असतो. दिंडी जसजशी पुढे सरकते तसा सगळीकडे उसळतो विठ्ठल नामाचा नाद-गंध. पावसाच्या शिडकाव्याने सारा परिसर आधीच अभिमंत्रित झालेला, त्यावर एक वर्ख चढवा तद्वत नामाच्या कल्लोळाने चराचरावर एक प्रकारचा हळवा ओलावा पसरलेला असतो.

 रस्त्यावरील माती ज्याच्यासाठी अबीर-गुलाल त्या वारकऱ्यांचा अवघा देह पदोपदी नाचत-गात बोलत असतो. दिंडी ही अशी बेभानपणे अनुभवायची असते, आत्मभान जागवत जगायची असते. वारीत सगळ्याचा विसर पडतो, दिंडीतील प्रत्येक पावलागणिक तुमचे पद, प्रतिष्ठा, परिवार सगळे काही मागे पडत असते, कारण वारकऱ्यांची नजर पंढरीच्या पांडुरंगाकडे लागलेली असते, कानात संतांच्या अभंगवाणीचा गजर घुमत असतो.
वारकऱ्यांचा धर्म अगदी वेगळा आहे. तेथे कर्मकांडाला स्थान नाही. संतांच्या म्हणण्यानुसार जो चांगला वागतो, जगतो तोच वारकरी. मग त्याच्या गळ्यात माळ असो नसो. कारण कपाळी अबीर, चंदन लावल्याने किंवा गळ्यात तुळशीमाळ घातल्याने वैष्णवांच्या मेळ्यात सामील होता येत नाही. तेथे कापरासाख्या निर्मळ मनाची गरज असते.
संसार पसारा, विषयांचा मारा !!
दु:खांचा भारा, माझ्या डोई !! 

Saturday, 17 June 2017

भक्ती प्रेमाचा मेळा ‘पंढरीची वारी’


अवघें जेणें पाप नासे ! तें हें असे पंढरीसी !! 
गात जागा गात जागा ! प्रेम मागा विठ्ठला!! 
अवघी सुखाची च राशी ! पुंडलिकाशीं वोळली हे !! 
तुका म्हणे जवळी आलें ! उभे ठालें समचरणीं!! 

हजारो वारकरी माऊली, दुकोबांच्या सोहळ्यात पंढरीची वाट चालत आहेत. आषाढ म्हटले की, अवघ्या वारकरी संप्रदाय आणि मराठी जणांना आषाढ वारीचे वेध लागतात. देहू आणि आळंदीहून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघताच त्यांच्याबरोबर वारकरी आणि भक्तांचा अथांग सागर टाळ-चिपळ्याच्या निनादात, विठूनामाचा जयघोष करीत पंढरीची वाट धरतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, परराज्यातूनच नव्हे तर परदेशातूनही लोक या वारीत सामील होत असतात. उण, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक चढ-उतार पार करत वारकरी पंढरीची वाट चालत असतो. परंतु, चालताना चालेला विठूनामाचा जयघोष त्यांना स्वर्गीय सुखाची प्राप्ती करून देत असतो. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या वारकऱ्यांना अशा संकटांची तमा नसते. अशी तळमळ, ओढ, प्रेम, निष्ठा दुसरीकडे क्वचितच पाहण्यास मिळत असावी. 
कोणतेही निमंत्रण नाही आग्रह नाही सर्व लोक स्वइच्छेने स्वखुशीने आणि स्वखर्चाने या वारीत सामील होत असतात. एका ध्येयाने इतका मोठा लोकसमूह एकत्र येऊन इच्छित स्थळी सुव्यवस्थितपणे एकमेकांना सहकार्य करत शिस्तीत पोचतो. अाबालवृद्ध, शिक्षित, अडाणी, गरीब, श्रीमंत सर्वच यात सामील होतात.
आषाढी म्हटले, की डोळ्यांसमोर पहिली येते, ती पंढरपूरची वारी ! भक्तीचा उत्सव, भक्त आणि ईश्वर यांचा अनोखा मेळा म्हणजे पंढरपूरची वारी. लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वाट धरतात, विठ्ठल विठ्ठलच्या नामस्मरणाने अवघे पंढरपूर दणाणून जाते, जात, धर्म, भाषा, द्वेष, मत्सर या पलीकडे जाऊन सर्व लोक एकमेकांना ‘माऊली-माऊली’ची हाक देतात. हा अनोखा माऊलीच्या अफाट प्रेमाचा मेळावा बघणाऱ्याचे खरेच डोळ्यांचे पारणे फिटतात असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आषाढीचा सोहळा म्हणजे महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आळंदी, देहू वरून पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. महाराष्ट्रात बहुसंख्य शेतकरी वर्ग हा खेड्यांपाड्यांतून राहतो आणि त्या वर्गात आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या म्हणजेच पंढपूरच्या प्रेमनगरी वारकरी चंद्रभागेच्या प्रेमात न्हाऊन त्याच्या आणि एकमेव फक्त त्याच्याच असणाऱ्या त्याच्या लाडक्या, प्राणप्रिय सावळ्या विठूमाऊलीच्या प्रेमात आकंठ डुंबून आणि ‘त्या’ सावळ्या परब्रह्माच्या चरणी स्वत:ला झोकून देऊन अमाप प्रेमाची लयलूट तर करतोच पण साठवणही करतो आणि पुढे वर्षभर व्यवहारात वापरतो. हा असतो अक्षय असा त्याच्या परम निधानाचा प्रेमाचा साठा - जो कधीच संपूच शकत नाही.
खेळ मांडीयेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे !
क्रोध अभिमान गेला पावतणी, एक एका लागतील पायी रे !!

Sunday, 11 June 2017

आत्मसाक्षात्काराचा सोहळा ‘पंढरीची वारी’

आत्मसाक्षात्काराचा सोहळा ‘पंढरीची वारी’


टाळी वाजवावी गुढी उभारावी,
वाट ती चालावी पंढरीच !!
पंढरीची हाट कौलांची पेठ,
मिळाले चतुष्ट वारकरी!!
पावसाळा सुरू झाला की, आषाढात पालख्यांचे वेध लागतात. आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकऱ्यांचे व्रत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम महाराजांच्या पादुका मिरवत या दिंड्या कैवल्याच्या पुतळ्याला भेटायला येतात. या वर्षी ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान १७ जून, तर तुकाराम महाराज यांचा पालखीचे प्रस्थान १६ जूनला होत आहे. या सोहळ्यासाठी सर्व महाराष्ट्रातून दिंड्या येतात. अगदी कर्नाटकातून, गोव्यातूनही दिंड्या येतात.
वारी हा अध्यात्मिक सुखाचा प्रवाह आहे. वारी हे एक व्रत आहे. संस्कार आहे. अट्टहासाने जोडलेला सद्‍गुण आहे. एकात्मतेची गंगोत्री आहे. वारी हा भगवतभक्तीचा नुसता अविष्कार असून मुक्तीतील आत्मनंदाचा आणि भक्तीतील प्रेमसुखाचा अनुभव आहे. कारण वारकरी हा भागवत संप्रदाय आहे. या संप्रदायाची शिकवण अगदी साधी-सोपी आहे. प्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, स्वधर्माचे पालन करावे पण हे करताना पांडुरंगाचे स्मरण करावे हीच भक्ती. त्यात कोणी उच्च नीच नव्हते, कोण्या एका जातीचे संत नाहीत. संतकवी कोण्या एका गावाचे नाही घराण्याचेही नाहीत.
सेना ‘न्हावी’, सावता ‘माळी’, नामा ‘शिंपी’, गोरा ‘कुंभार’, नरहरी ‘सोनार’ कान्होपागा ‘वारांगना’, एकनाथ ‘ब्राह्मण’, तर चोखा ‘महार’ अशी एकात्मतेती शिकवण. विठ्ठलाच्या गावा जावे, विठ्ठलरूप व्हावे हेच सत्य आहे. विठ्ठलाला माऊली मानणाऱ्या या संताच्या मनात विठ्ठल ही प्रेम-वात्सल्याची मूर्ती आहे. सासुरवाशीण मुलगी माहेराला जाते.
प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यसाठी सकल संताची मांदियाळी वैष्णवांसह पंढरपुरी जायला निघतात. जागोजाग मुक्काम करीत पायी पंढरपुरास पोचते. एका अर्थी ही संत साहित्य संमेलने होतात. चर्चा होतात. अनुभवी, अभ्यासू वारकऱ्यांची कीर्तने होतात. त्यातून टाळकऱ्यांचे सहज शिक्षण होते. वारीची ही वाट संतांनी दाखविली आणि याच मार्गावरून वाटचाल करीत जीवनालाच सदाचारी बनविले. हा मार्ग अनुभवसिद्ध आहे. एखादी सहल काढायची तर किती तयारी, विचार करावा लागतो जेवढी‍ सहलीला येणाऱ्याची संख्या जास्त तेवढा तणाव अजून वाढतो. पण वारीचे तसे नाही, वारी ठरावीक तिथीला निघते आषाढीला पोचते. कोणाला निमंत्रण नाही. वर्गणी नाही. सक्ती नाही. पण विणेकर्यांच्या भोवती दिडींचा आराखडा. रांगा किती, महिला किती, महिला वारकरी कुठे, सगळे काही ठरवल्यासारखे. गोपालकाल्यात सर्वांच्या शिदोऱ्या एक करतात आणि नंतर वाटून घेतात, नकळत एकमेकांची प्रांपचिक दु:खेही वाटून घेतात.
पताकांचे भर मिळाले अपार,
होतो जयजयकार भीमा तीरी !!
हरिनाम गर्जता भय नाही चिंता,
ऐसे बोले गीता भागवत !!
खटनट यावे शुद्ध होऊनी जावे,
दवंडी पिटी भावे चोखा मेळा !!

Sunday, 4 June 2017

संत तुकोबांचे एकनिष्ठ शिष्य ‘निळोबाराय’

संत तुकोबांचे एकनिष्ठ शिष्य ‘निळोबाराय’



तुमचे चरणी राहो मन, करा हे दान कृपेचे !!
नामी तुमचे रंगो वाचा, अंगी प्रेमाचा आविर्भाव !!
संत निळोबाराय हे वारकरी सांप्रदायातील थोर संत. निळोबाराय यांचा जन्म श्री तीर्थक्षेत्र पिंपळनेर (अहमदनगर जिल्हा, ता. पारनेर) इ.स. १६३५ मध्ये झाला. वडील मुकुंदबाबा व आई राधाबाई. घरातील सात-आठ पिढ्यांनी जमवलेली ३००-४०० ग्रंथांची ग्रंथसंपदा मिळाली आणि निळोबांचे वाचन सुरू झाले. त्यांचे वाचन अगदी स्पष्ट. आवाज खणखणीत त्यामुळे आजूबाजूच्या आया-बाया येऊन बसू लागल्या. नंतर गर्दी वाढू लागली. काही पुरुषही येऊ लागले. निळोबा मधून मधून छान निरुपण करत. भावार्थ रामायण झालं, नाथभागवत झालं. पाठोपाठ ज्ञानेश्वरी झाली. मग हे तीनही ग्रंथ त्यांनी स्वहस्ताक्षरात दीड-दोन वर्षांत नकलून काढले.
बघता बघता निळाला सोळावे लागले. मधल्या ४-५ वर्षांच्या काळात त्याने शेषाचार्यांकडून संस्कृत शिकून घेतले होते. पंतकाकांकडून कुलकर्णीचे कामकाज शिकून घेतले. शिवाय ज्ञानदेव, नामदेव व एकनाथ महाराज यांचे अभंग, गौळणी, भारूडं हे सारं नकलून घेतलं.
आता राधाबाईंना (निळोबांच्या आईला) सुनमुख पहायची घाई झाली. पंतांकडे तिने टुमणं लावलं. वाळकीच्या अप्पासाहेब जहागीरदारांची मुलगी मैना ही सून म्हणून मकाशिर्यांच्या घरात आली. आणि वर्षभरातच भगवान रामलिंगाच्या आज्ञेने पंतांचं निर्वाण झालं. निळूचे पितृछत्र हरपले आणि दोनच महिन्यात मातोश्रींनी जीवनयात्रा संपवली.
निळोबास आता पंढरीची ओढ लागली होती. ज्ञानोबा माऊली, नामदेव, चोखोबा, गोरोबा, जनाई, नाथमहाराज, तुकाराम महाराज अशा थोर थोर संतांनी वर्णिलेलं ते विटेवरचे सावळे परब्रह्म डोळे भरून पहावे, अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. काही आठवड्यांतच मैनेस दिवस गेले आणि एका पौषात सुमुहूर्तावर सगळे पंढरीस निघाले. जशी पंढरी जवळ येऊ लागली तशी निळोबांची वृत्ती प्रफुल्लित झाली. दुपार टळत आली होती. पंढरीच्या वेशीस पोचले आणि निळोबाने तडक गाडीतून उडी मारली. वेशीसमोर दंडवत घातले. त्यांचे डोळे प्रेमाश्रुंनी भरले होते.
निळोबाचा एक आठवडाभर मुक्काम पंढरीस होता. रोज सायंकाळी निळोबा राऊळी कीर्तन करत असे. ते रसाळ कीर्तन ऐकण्यास रोज गर्दी वाढू लागली. भाविक त्यांना संत निळोबाराय म्हणू लागले. लोकांची उपाधी वाढू लागली तसं निळोबांनी मुक्काम हलवण्याची तयारी केली. पंढरीच्या त्या मुक्कामात श्री पांडुरंग व त्याची पुण्यनगरी यावर निळोबांनी सुमारे दीडशे अभंग रचले. श्री क्षेत्र आळंदीसही तोच प्रकार. श्री ज्ञानदेवांच्या समाधीवर मस्तक टेकवता निळोबांस गहिवरून आले. आणि त्यांच्या मुखी ज्ञानेशाची स्तुती उमटली. संत निळोबाराय यांनी श्री तीर्थक्षेत्र पिंपळनेर येथे इ.स.१७५१ मध्ये ठिकाणी निळोबारायांनी समाधी घेतली.