Saturday, 18 March 2017

मानवता हीच मानवाची जात : संत रोहिदासा


मानवता हीच मानवाची जात : संत रोहिदासा

ऐसा चाहो राज मे, जहाँ मिले सबन को अन्न !
छोट बडो सभ सम बसे, रविदास रहे प्रसन्न !!
संत रोहिदास यांचा जन्म उत्तर प्रदेशातील काशी (वाराणशी) जवळील मांडूर या गावचा. चर्मकार समाजातील रघुराम व कर्मादेवी या दांम्पत्याच्या घरी १३७३ मध्ये माघ पौर्णिमेस त्यांचा जन्म झाला. या कालखंडात भारतीय समाजव्यवस्थेत जातीयतेने थैमान घातले होतं, प्रचंड भेदभाव होते. अशा सामजिक व्यवस्थेविरुद्ध संत रोहिदासांनी अध्यात्मिक वाणीने धार्मिक सहिष्णुता, सामाजिकता या उद्देशाने जनतेसाठी लढा उभारला. मानवता हाच खरा धर्म त्यांनी समाजासमोर मांडला. म्हणून ते मानवतेचे आद्य पुरस्कर्ते होते. संत रोहिदासांचे विचार आजही भारतीय समाजाच्या विकासासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहेत.
संत रोहिदास लहानपणापासून भक्तीवेडे, त्यामुळे भजन, पूजन तसेच साधुसंतांच्या सेवेत त्यांचा वेळ जात असे. रोहिदासांचा कालखंड म्हणजे प्रचंड समाजिक विषमता, अन्याय, अत्याचार आणि शोषणाचा होता. त्यांनी अध्यात्माव्दारे भारतीय समाज जागृतीचे काम असीम निष्ठेने, अविरत परीश्रम आणि सदाचाराच्या बळावर केले. अध्यात्मिक ज्ञान, सामाजिक विचार, जनसमान्यांपर्यंत पोहचवतानाच त्यांनी समाजाला एकत्रीत आणून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
संत रोहिदासांचे भारतीय समाजव्यवस्थेतील वर्णव्यवस्था व जातीयतेबद्दलचे विचार परखड आणि स्पष्ट होते. ते म्हणतात, भारतीय सामाजिक व्यवस्था केळाच्या झाडासारखी आहे. ज्याप्रमाणे केळाच्या झाडामध्ये पानानंतर पान आणि त्यानंतर पान याप्रकारे शेवटपर्यंत पानेच मिळतात, तशीच स्थिती या समाजव्यवस्थेची आहे. ज्यामध्ये जाती नंतर जात, आणि पुन्हा जात, शेवटपर्यंत जातच दिसते. त्या समाजव्यवस्थेत जातीयतेमुळे बहुसंख्य लोक दु:खी, पीडीत होते. त्या विषयी ते म्हणतात, की सर्व लोक जातीव्यवस्थेच्या चक्रव्यूहात फसलेले आहेत. या जातीच्या रोगाने मानवतेला खाऊन टाकलेले आहे.
संत रोहिदासांचा एकच देव होता. तो म्हणजे निराकार निर्गुण मानवधर्म. मानवता हीच मानवाची जात आहे. या विचाराचे ते पुरस्कर्ते होते. संत रोहिदासांनी संपूर्ण भारतात भ्रमण करून जातीभेद, उच्चनीच भेदभाव, सामाजिक विषमता तसेच वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध जणू समाजिक संघर्षांचा पाया रचला. त्यांनी समाजिक समता, धार्मिक एकता व मानवतेचा पुरस्कार केला. गुरू रोहिदासांनी समाजाला मुक्तीचा संदेश दिला. गुलामगिरीच्या विरोधात विद्रोह करण्याचा संदेश दिला. दुसऱ्यावर अवलंबून राहणे पाप आहे हे पटवून दिले. रोहिदासांनी ६०० वर्षांपूर्वीच अशा राज्याची कल्पना केली होती की, जेथे सर्वाना अन्न मिळेल, सर्व समान राहतील, कोणी उच्चनीच राहणार नाही, ते म्हणतात की,
ऐसा चाहो राज मे, जहाँ मिले सबन को अन्न ।
छोट बडो सभ सम बसे, रविदास रहे प्रसन्न ।।
त्यांना सामाजिक समता हवी होती. ते अशा कल्याणकारी राज्याचे उपासक होते, जेथे सर्वाना न्याय, समता, अन्न, वस्त्र, निवारा, मिळेल व जातपात विरहित सामाजिक समता असेल त्यांच्या अध्यात्मिक ज्ञानामुळे भारतभर त्यांचे शिष्यगण तयार झाले. चितोड राज घराण्याची मीराबाई राणी झाली, पीपाजी महाराज व इतर त्यांचे असंख्य शिष्य बनले. संत कबीर आणि गुरू नानक हे रोहिदासांचे समकालीन होते. कबीरांनी गुरू रोहिदासांना मोठे बंधू मानले होते, तर ‘गुरू ग्रंथ साहिबा’ या शिखांच्या धर्मग्रंथात रोहिदासांनी ४० पदे आहेत. संत रोहिदासांनी भारतीय दलित-बहुजन समाजाला संघटीत करण्यासाठी सतत प्रयत्न केले. माझ्या सज्जनांनो, संघटीत व्हा, ज्याप्रमाणे मधमाशा एकत्रित राहतात त्याप्रमाणे संघटीत व्हा, असा उपदेश त्यांनी केला.
संत मीरा चितोड राजघराण्याची राणी होती. परंतु, संत रोहिदासांच्या आध्यात्मिक ज्ञानाने प्रभावित होऊन तिने शिष्यत्व पत्करले होते. संत रोहिदासांना चितोड येथे येण्याचे आमंत्रण दिले होते. संत रोहिदासांचे संपूर्ण जीवन संघर्षमय होते. स्पृश्य-अस्पृश्यतेमुळे ब्राह्मण-पंडितांशी त्यांना वाद विवाद करावे लागले.
संत रोहिदासांचे मानवी मूल्य जपणारे मानवतावादी विचार आजही योग्य व आदर्शवत असून समाजाला प्रेरणा देणारे आहेत. आजही भारतीय विषमतावादी समाज व्यवस्थेला बदलून टाकण्यासाठी पुन्हा संत रोहिदासांच्या मानवतावादी विचारांची पेरणी समाजाच्या सर्व घटकांपर्यंत होणे आवश्यक आहे. भारतीय समाज एकसंघ, वर्गविरहीत करण्यासाठी आध्यात्मिक आणि धार्मिक सहिष्णुतेतून समता व मानवता हाच मानवाचा धर्म या संत रोहिदासांच्या विचारांची मूल्ये भारतीय समाजव्यवस्था सुदृढ करण्यासाठी पोषक ठरणार आहेत. संत रोहिदासांच्या आध्यात्मिक, सामाजिक व मानवतावादी विचारांची दिव्यज्योत महाराष्ट्रातील चर्मकार समाजाने एक दिलाने तेवत ठेवली आहे.  माघ पौर्णिमेला संत रोहिदास जयंती साजरी केली जाते.
--------

Saturday, 11 March 2017

माणसात देव शोधणारा संत 'गाडगेबाब'




देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी !! देव चोरून नेईल, अशी कोणाची पुण्याई !!
 देव अंतरात नांदे, दे दही दिशा कोंडे !! देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी!

महाराष्ट्रातील संतपरंपरेबाबत ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस असे म्हटले जाते. तर संत गाडगेबाबांनी २० व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली. महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत. लोकसेवेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांचे अमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या पुलाजवळ २० डिंसेंबर १९५६ रोजी देहावसान झाले. अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन ते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे करण्यात आले आहे. गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर. त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता. 

विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल मृत्यू वारले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे सर्व जनांनी एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी गावकऱ्यांना शिकविला. १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत असत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्‍न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला आहे.
देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत. गाडगे बाबांनी अनेक धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषानेअमरावती जवळ वलगाव येथे पेढी नदीच्या काठावर २० डिंसेंबर १९५६ आपला देहा ठेवला.

देव शोधोनिया पाही, देव सर्वांभूता ठाई !!
 देव मूर्तीत ना मावे, तीर्थक्षेत्रात ना गावे !!

Saturday, 4 March 2017

प्रतिकाराचे सजीव रूप म्हणजे संत मुक्ताई


शुद्ध ज्याचा भाव झाला ! दुरी नाही देव त्याला !!
अवघी साधन हातवटी ! मोले मिळत नाही हाटी !!
संत मुक्ताबाई ह्या संत ज्ञानेश्वरांच्या धाकट्या बहीण म्हणून सर्वांना परिचित आहेत. यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील आळंदी देवाची येथे इ.स.१२७९ मध्ये झाला. संत निवृत्तिनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे त्यांचे थोरले भाऊ. परंतु, संत मुक्ताबाईचे स्वतःचेही स्वतंत्र अस्तित्व होते. त्यांनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या ताटीच्या अभंगांमध्ये त्यांनी संत ज्ञानेश्वरांना उपदेश केला आहे.
योगी पावन मनाचा ! साहे अपराध जनाचा !!
विश्वरागे झाले वन्ही ! संती सुखे व्हावे पाणी !!
संत मुक्ताबाई ह्या योगी चांगदेवांच्या गुरू. आपल्या भारतीय वैदिक संस्कृतित स्त्री ही देवतास्वरुप मानली जाते. देवी स्वरुपात तिचे पूजन केले जाते. आदिमाता, दुर्गामाता, महिषासूरमर्दिनी, महाकाली, महालक्ष्मी, पार्वती, महासरस्वती, महादेवी अशी ह्या स्त्रीदेवतांची अनेक रुपे आणि अनेक नावे आहेत. स्त्री ही सृजनाची शक्ती आहे. सर्व विश्वाची जननी आहे. ती पूजनीय आणि प्रार्थनीय आहे. आपल्या प्राचीन पुराणकाळातील अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी ह्या देवतास्वरुप स्त्रिया प्रातःस्मरणीय मानल्या जातात. त्याचप्रमाणे अलिकडच्या कालखंडातील म्हणजे सतराव्या शतकापर्यंतच्या कालखंडातील पाच संतस्वरुप स्त्रियादेखील वंदनीय आहेत.
महानुभाव पंथातील चक्रधर स्वामींची शिष्या महादाइसा, संत निवृत्तीनाथांची धाकटी बहीण मुक्ताबाई, संत नामदेवांची दासी जनाबाई, संत तुकारामांची शिष्या बहिणाबाई आणि समर्थ रामदास स्वामींची शिष्या वेणाबाई. ह्या पाच स्त्रियाही परमार्थमार्गातील संतपदाला पोहोचलेल्या तितक्याच आदरणीय आणि वंदनीय अशा स्त्रिया आहेत. ह्या स्त्री संत मालिकेत संत मुक्ताबाई ही मात्र, सर्वश्रेष्ठ आणि अग्रणी आहे. मुक्ताई ही साक्षात आदिमायेचेच प्रकट रुप होती. इ.स. १२७९ ते १२९७ ह्या कालखंडातील मुक्ताईचे एकूण आयुष्य अवघे १६-१७ वर्षांचेच होते. परंतु, एवढ्या अल्पायुषी आयुष्यातही तिने ज्ञान प्राप्त करून घेतले आणि ती संतपदावर आरुढ झाली. इतक्या लहान वयातली तिची प्रतिभा आणि परमार्थ मार्गातील तिने मिळविलेले ज्ञान आणि उच्चपद हे स्तिमित करणारे आहे.
मुक्ताबाई ही निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान या अलौकिक संतत्रिमूर्तींची तशीच अद्वितीय धाकटी बहीण. भावंडांमध्ये सर्वात लहान. ह्या भावंडांच्या आई-वडिलांनी म्हणजे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी देहत्याग केला तेव्हा मुक्ताई अवघी तीन-चार वर्षांची होती. सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेचा प्रतिकार करण्याऱ्या मुक्ताबाईचा आध्यात्मिक अनुभव थोर होता. ज्ञानेश्वरादी भावंडांमधील अस्मिता, स्वाभिमान, प्रतिकार यांचे सजीव रूप मुक्ताबाई होय. मुक्ताबाई आयुष्यातील प्रत्येक प्रसंगांना निर्भयपणे खंबीरपणे सामोरी जाते. विवेक तर मुक्ताबाईत दृढपणे विसावलेला. म्हणून जेव्हा जनसमाजाकडून प्रत्येकवेळी होणारी उपेक्षा व अपमान सहन न होऊन, ज्ञानेश्वर जेव्हा उद्विग्न स्थितीवर मात करावी म्हणून पर्णकुटीची ताटी (दार) बंद करून ध्यानस्थ बसले. त्यावेळी केवळ नऊ वर्षांची लाडीवाळ मुक्ताबाई कर्तव्यदक्ष पित्याची कठोर जबाबदारी आत्मविश्वासाने पेलून आपल्या वत्सल अभंगवाणीने ज्ञानदेवांना उद्देशून योग्याची लक्षणे कथन करते. दु:खी  अपमानित ज्ञानदेवांचे ताटीच्या अभंगात सांत्वन करते.
शब्द शस्त्रे झाली क्लेश ! संती मानवा उपदेश !!
विश्वपट ब्रम्हा दोरा ! तटी उघडा ज्ञानेश्वरा !!
ताटीच्या अभंगात मुक्ताबाईचे हळुवार, समंजस, प्रसंगावधानी, उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे. त्यात मुक्ताबाईंनी जी संतत्वाची लक्षणे सांगितली आहेत, ती मूर्तिमंत तिच्या व्यक्तित्वात दिसून येतात.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्री क्षेत्र अाळंदी येथे संजिवन समाधी घेतल्यानंतर सोपानकाका सासवडला समाधिस्त झाले. नंतर नेवासा, अापेगांव, पुणतांबे, पैठण, घृणेश्वर, पहुर, जामनेर, बोदवड मार्गे हि संत मंडळी  सर्व मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) येथे अाले असता १५ दिवस मुक्ताईनगर कोथळी परिसरात वास्तव्य करुन वै. वद्य १० ला दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुक्ताई स्व-स्वरुपकार झाल्या. त्याच मुक्ताईच्या पावन भुमीमध्ये मुक्ताई समाधी स्थळ व प्रगट्य स्थान म्हणून भव्य मंदिर अाहे.
सुख सागर अापण व्हावे ! जग बोधे निववावे !!
बोधा करू नये अंतर ! साधु नाही अापपर !!

                                                       -भागवत पेटकर