Saturday, 11 February 2017

रसाळ वाणीचा झरा : संत गोरोबा

रसाळ वाणीचा झरा : संत गोरोबा 

निर्गुणाचा संग धरिला जो आवडी ।
तेणें केलें देशोधडी आपणियाशी ॥
अनेकत्व नेलें अनेकत्व नेलें ।
एकलें सांडिलें निरंजनीं, मायबापा ॥

देवांनी सुद्धा भारतभूमीवरच जन्म घेतला. ही देवभूमीच आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात.  संत हे चालते फिरते देवच मानले जातात. आपल्या देशात संतांना गुरू मानण्याची परंपरा आहे. गुरूचे महत्त्व आपल्या सर्वांना माहीतच आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई, संत रोहिदास, संत सावता आणि समर्थ रामदास हे मराठी संत महाराष्ट्राचे प्रणेते आणि महाराष्ट्रधर्माचे संत होते. त्यांच्यामुळे आध्यात्मिक समता घडली. माणूस उभा राहिला तरच देश उभारेल, हे जाणून संतांनी जागृतीचे काम केले. त्यातलेच एेक संत गोरा कुंभार.
उस्मानाबाद पासून २२ कि.मी. अंतरावर असलेल्या तेर या गावी प्राचीन संस्कृतीच्या पाउलखुणा आजही स्पष्ट जाणवतात. प्राचीन काळात प्रदेशासी व्यापार संबंध असलेले तेर हे गाव प्रख्यात राष्ट्रीय संत गोरोबाकाका कुंभार यांच्यामुळे महाराष्ट्रला ज्ञात आहे. या गावात गोरोबाकाकाचे जुने राहते घर असून तेरणा नदीच्या काठावर त्यांची समाधी मंदिर आहे. तर येथील कांही मंदिरे स्थापत्यशास्त्राच्या बांधकामामुळे प्रसिद्ध आहेत. गावाच्या आग्नेय दिशेला श्री नृसिंहाचे एक जुने मंदिर आहे. तर गावच्या मध्यभागी त्रिविक्रमाच्या भव्य अशा मूर्ती समोर विष्णूची मूर्ती आहे.
 संत गोरोबा कुंभारांचा जन्म इ.स.१२६७ मध्ये झाला. गोरोबा पेशाने कुंभार होते. संत नामदेव व ज्ञानेश्वरांचे ते समकालीन होते, संत गोराबा हे ज्ञानेश्वर, निवृतीनाथ, मुक्ताबाई, सोपान आदि संत मंडळींमध्ये वयाने सर्वांहून वडील होते. त्यामुळे सर्व जण त्यांना गोरोबाकाका म्हणत असत. गोरोबांनी ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव,चोखामेळा, विसोबा खेचर आदि संताची, कोणाचे मडके (डोके) किती पक्के, अशी प्रत्येकाच्या डोक्यावर मारून परीक्षा घेतली. त्यावेळी ज्ञानेश्वरांनी त्यांना गुरूपदेश घ्यावयास सांगितले. तेव्हा संत नामदेवांनी विठोबा खेचरांना आपले गुरू केले. संत गोरोबांची उपलब्ध असलेली काव्यरचना थोडीच आहे. त्यांचे सुमारे २० अभंग सकलसंत गाथेत समाविष्ट आहेत. गोरोबांचे अभंग म्हणजे रसाळ वाणीचा झरा, सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत त्यांचे अभंग आहेत. निर्गुणाचा संग धरल्यावर काय अवस्था होते हे त्यांनी आपल्या अभंगात सांगितले आहे. अस्या महान गोरोबांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (१० एप्रिल १३१७) तेर गावी समाधी घेतली. हे गाव सध्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यात असून लातूरपासूनही जवळ आहे.
एकत्व पाहतां अवघें लटिकें ।
जें पाहें तितुकें रूप तुझें, मायबापा ॥
म्हणे गोरा कुंभार सखया पांडुरंगा ।
तुम्हा आम्हा ठावा कैसे काय, मायबापा ॥
       
-भागवत पेटकर

No comments:

Post a Comment