ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया !
तुका झालासे कळस, भजन करा सावकाश !!
संत ज्ञानेश्वर म्हणजे सुमारे ८०० वर्षांपूर्वी महाराष्ट्राला पडलेले सुंदर आध्यात्मिक स्वप्न. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील न प्राणसखा हा समर्पक शब्द चोखोबांनी (तेराव्या शतकात) संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे. संत ज्ञानेश्वरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव या गावी (इ.स. १२७५) मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणीबाई. गोविंदपंत व मीराबाई हे त्यांचे आजोबा-आजी. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई हे भावंड. निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्र्वरांचे सद्गुरू होते. नेवासा क्षेत्रात आपल्या सदगुरूंच्या कृपाशिर्वादाने भगवदगीतेवर त्यांनी टीका लिहिली. या ग्रंथास ज्ञानेश्वरी असे म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
भूतो न भविष्यति असे अजोड व्यक्तिमत्त्व आणि अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर. गेली अनेक वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने हे व्यक्तिमत्त्व आपल्या मनात जपले आहे. ब्रम्ह साम्राज्य चक्रवर्ती, महान तत्त्वज्ञ, विठ्ठलाचा प्राणसखा अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते.
माझा मराठाचि बोलू कौतुके । परि अमृतातेहि पैजासी जिंके । ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन ।।
असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. सर्व स्तरांतील लोकांना ज्ञानेश्वरी ग्रंथाने भुरळ घातली. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. पसायदान ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणाऱ्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ (इ.स. १२१२) मध्ये लिहिला गेला.
त्यांचा दुसरा ग्रंथ अमृतानुभव होय. चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला. संत ज्ञानेश्वरांचा हरिपाठ हा नामपाठ आहे. यात हरिनामाचे महत्त्व सांगितले आहे. ही वारकऱ्यांची त्रिकाल संध्याच आहे. हे अभंग आशयसंपन्न तर आहेतच परंतु प्रत्यक्ष अनुभूतिसंपन्न आहेत. हरिप्राप्तीचे सोपे सुलभ साधन म्हणजे नामस्मरण होय, हे हरिपाठ सांगतो. अखिल विश्वाची जणू काळजी वाहणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने माउली म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाडःमय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित केली.
ज्ञानदेवांनी वयाच्या २१ व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली. (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, इ.स.१२९६, वार गुरुवार) हा ज्ञानसूर्य मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.
नामा म्हणे आता लोपला दिनकर !
बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ !!
भागवत पेटकर
No comments:
Post a Comment