Friday, 6 January 2017

संत जनाबाई : तेजस्वी स्त्री शक्तीचा हुंकार म्हणजे जनाई


संत जनाबाई :  तेजस्वी स्त्री शक्तीचा हुंकार म्हणजे जनाई

जनीचे अभंग  लिहीत नारायण ।  करीत श्रवण साधु संत।।
धन्य ते ची जनी, धन्य  तेची भक्ती । नामदेव स्तती करीतसे।।

‘स्त्री संत’ शब्दाचा भावार्थ ध्यानी घेताना काना-मात्रा देताच अक्षरांना पंख फुटतात. आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी सुख-दु:ख, मानहानी, प्रतिकूल प्रसंग यांना सामोरं जावं लागतं. संत-महंत त्यातही विशेषत: स्त्री संतांना. त्यातल्या एक संत जनाबाई. जनाबाई या संत कवयित्री म्हणून लोक प्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यापासून स्रिया जात्यावर दळण दळताना, कांडतात आजही ओव्या गातात. गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईचे गाव. जनाबाई ह्या पंढरपूरचे वारकरी ‘दमा’ आणि भगवद्भक्त स्त्री ‘करुंड’ या भक्ताच्या पोटी जनाबाईचा जन्म झाला. आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. तिच्या वडिलांनी जनाबाईंन दामाशेटी  शिपीं यांच्या पदरात टाकल. तेव्हापासून त्या संत  शिरोमणी नामदेव महाराज यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत. संत नामदेवांच्या सहवासात जनाबाईनीही  विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता. ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ असे त्या म्हणत असत. संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरू होत. श्री संत ज्ञानदेव- विसोबा खेचर- संत नामदेव- संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे.
विठू माझा लेकुरवाळा ! संगे गोपाळांचा मेळा ! हा प्रसिद्ध अभंग जनाबाईंचाच आहे. त्यांना संत नामदेवांमुळे सतत संत-संग घडला होता. ज्ञानदेवांविषयीही त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता. परलोकीचे तारू ! म्हणे माझा ज्ञानेश्र्वरु ! असे त्यांनी ज्ञानेश्र्वरांविषयी म्हटले आहे. घरातील इतर कामे करत असतांना त्या सतत देवाचे नामस्मरण करत असत. जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे ३५० अभंग सकल संत गाथा या ग्रंथात मुद्रित झाले आहेत. त्यांचे अभंग कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा या विषयांवर आहेत. पूर्ण निष्काम होऊन लौकिक, ऐहिक भावना विसरून त्या विठ्ठलाला शरण गेलेल्या आहेत. आत्मज्ञानाचा साक्षात्कार घडण्यापूर्वीच त्या निर्विकार झाल्या आहेत. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांनी त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत.
संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण, तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो. वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, सहनशीलता, स्त्री विषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपान, संत गोरा कुंभार, संत चोखा मेळा, संत सेना महाराज आदि सत्पुरुषांच्या जीवनाचा, सद्गुणांचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच करून ठेवले आहेत. त्यांची भाषा सर्वसामान्य माणसांच्या हृदयाला जाऊन भिडते. जनाबाई श्री क्षेत्र पंढरपूर येथे महाद्वारी, आषाढ कृष्ण त्रयोदशी शके १२७२ या दिवशी समाधिस्थ होऊन पांडुरंगात विलीन झाल्या.
माझा लोभ नाहीं देवा । तुझी करीं ना मी सेवा ! नाहीं अंगीं थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ! 
ज्ञानाई आई । आर्त तुझे पायी । धावुनिया येई । दुडदुडू।।
स्त्री संतांच्या मांदीयाळीत जनाईचं असं अनेक पदरी नात्यांनी गुंफलेलं आगळंवेगळं स्थान आहे. जनसामान्य दासी जनीची स्त्री संत मालेतील एक असाधारण व्यक्तित्वाची संत जनाबाई एक संत कवियित्री म्हणूनही नावाजली गेल्यानं वारकरी संप्रदायातही तिचं अभंगस्थान आहे. निरंतर तेवणारी अक्षयज्योत म्हणजे तिची आत्मसाक्षात्कारी अभंगवाणी. जनसामान्यांची प्रतिनिधी, तेजस्वी स्त्री शक्तीचा हुंकार म्हणजे जनाई. संत जनाबाई समस्त स्त्री जातीला बजावणारी. ''स्त्री जन्म म्हणवुनी न व्हावे उदास''  तिचे हे भावस्वर प्रत्येक स्त्रीला उदंड ऊर्जा देत सकारात्मकतेची, चैतन्याचे स्फूलिंग स्त्री हृदयात चेतवत ठेवेल. त्यासाठी त्या स्वरवेधाची मनाला आस हवी.

No comments:

Post a Comment