सोंवळ्या ओंवळ्या राहिलो निराळा, पासुनी सकळा अवघ्या दुरी!
श्री जंगली महाराज हे नाव महाराष्ट्राच्या संतमंडळात प्रख्यात आहे.
जंगली महाराज हे मध्ययुगीन संत. जंगली महाराज या नावावरुन ते कोणत्या
धर्माचे वा कोणत्या पंथाचे होते, याची काहीच कल्पना येत नाही. हे नाव इतके
रूढ झालं आहे की, ते आपलेच संत आहेत, असे विविध धर्मांच्या आणि पंथांच्या
लोकांना वाटते आणि यातच त्यांचे खर संतत्व दडले आहे. जंगली महाराज म्हटले
की, ते पुण्याचेच अशीही एक सर्वसामान्य समजूत आहे. तीही चुकीची आहे, असे
म्हणता येणार नाही, कारण महाराजांचे वास्तव्य बराच काळ पुण्यातच होते आणि
त्यांचे बरेचसे कार्यही पुण्यातच झाले आहे.
जंगली महाराज हे अलीकडील
काळातील संत असूनही त्यांच्या जीवनचरित्राचा फारसा तपशील जनसामान्यांना
माहित नव्हता. तो उपलब्ध करून घेण्यासाठी पुण्यातील उत्कृष्ट चित्रकार डी.
डी. रेगे यांनी जवळपास एक तपभर संशोधन करून जणू एक तपचे केले. त्यासाठी ते
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील विविध विभागात गेले. त्यांच्या
शिष्यप्रशिष्यांना भेटले, त्यांच्या घराण्यातील लोकांना भेटले, अनेक उर्दू,
फार्सी, मोडी दस्तावेजांचा त्यांनी धांडोळा घेतला. सुप्रसिद्ध
इतिहास-संशोधक डॉ. ग. ह. खरे यांच्यासारख्या चिकित्सक अभ्यासकांशी चर्चा
केली. जंगली महाराज हे मुस्लिम संत होते. त्यांचे मूळ नाव जंगली शहा.
त्यांच्या शिष्यांमध्ये आणि भक्तांमध्ये अनेक जातीधर्मांचे लोक आहेत.
मोहंमदशहा कादरी यांनाच जंगली शहा असे म्हणत असत. महाराष्ट्रातील बहुतेक
सूफी संत हे कादरी या शाखेचेच होते. या संदर्भात योगसंग्रामाचे कर्ते शेख
मोहंमद, सिद्धांतबोधाचे कर्ते शहामुनी, नागेश संप्रदायाचे आलमखान, मुंतोजी
बामणी यांचा उल्लेख करता येईल.
जंगली शहा यांचे जन्मगाव सोलापूर जवळील होनमूर्गी हे लहानस खेड आहे. हिंदू इस्लाम आणि वीरशैव अशा वेगवेगळ्या धर्माचे लोक या गावात शतकानुशतके गुण्यागोविंदाने नांदत आहेत. होनमूर्गीचे कुलदैवत बसवेश्वर हे आहे. तिथे जसे बसवेश्वराचे मंदिर आहे त्याचप्रमाणे मेहबूब सुसानी या पीरांचा दर्गाही आहे. जंगलीशहा हे बालपणापासूनच अत्यंत तल्लख बुद्धीचे होते. मराठी, कन्नड, उर्दू आणि फार्सी या भाषा त्यांनी बालपणापासूनच आत्मसात केल्या होत्या. त्यांची प्रवृत्ती धार्मिक असल्यानं त्यांनी वेगवेगळ्या धर्माचा अभ्यास केला.
हजरत शहा ताहेर कादरी सत्तारी हे त्यांचे मुस्लिम गुरू होते. अक्कलकोटच्या परिसरात महान धर्मगुरू म्हणून ते मानले जात. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे ताहिरशहांचे समकालीन होते. ते दत्तोपासक होते. जंगलीशहा सर्वसंग-परित्याग करून विरक्त झाले. त्यांनी विजापूर, कुडची, जमखंडी, मिरज, नरसोबाची वाडी, रेठरे आणि नेर्ले अशा विविध ठिकाणी वास्तव्य केलं व लोकहिताची अनेक कामं करायला प्रारंभ केला. वेगवेगळ्या धर्मपंथातील लोकांचा त्यांचा शिष्य-परिवार वाढत वाढत चालला.
त्यांनी जागोजाग धर्मशाळा, मंदिरं, मशिदी, दर्गे, घाट इत्यादी असंख्य बांधकामं केली व त्यांची नीट व्यवस्था लावून दिली. उत्तरायुष्यात ते पुण्याला आले व तिथंही त्यांनी लोकहिताची कामं केली. कीर्तन-प्रवचनांच्या माध्यमातून जनसामान्यांवर उदात्त संस्कार केले. इ.स. १८९० च्या प्रारंभी महाराजांची प्रकृती खालावली. त्या काळातही ते योगसाधना करीत असत. आपल्या आयुष्याच्या सायंकाळीची चाहूल लागली असल्यानंच जणू भांबुडरयाच्या टेकडीवर आपल्या समाधीची जागा त्यांनी निश्चित करून ठेवली होती. ४ एप्रिल १८९० रोजी महाराजांनी आपली इहलोकींची यात्रा संपविली.
परें परतें मज न लगे सांगावें, हें तो बरे देवे शिकविले!!
दुसऱ्यातें आम्ही नाही आतळत, जाणोनी संकेत उभा असे!!
No comments:
Post a Comment