Thursday, 12 March 2015

इंद्रायणी काठी देवाची आऴंदी लागली समाधी ज्ञानेशाची

इंद्रायणी काठी देवाची आऴंदी लागली समाधी ज्ञानेशाची



चला आळंदीला जाऊ । ज्ञानदेवे डोळा पाहु॥
होतील संतांच्या भेटी । सांगू सुखाच्या गोष्टी ॥
ज्ञानेश्वर,ज्ञानेश्वर,ज्ञानेश्वर,ज्ञानेश्वर।
सुखी म्हणता चुकतील फेरे ॥
जन्म नाही रे आणखी । तुका म्हणे माझी भाक॥

आळंदी हे महाराष्ट्राच्या धार्मिक भावनांचे केंद्रबिंदु आहे. आळंदीचे  नाव    ऐकले  की, ज्ञानेश्वर  माऊलींची  वात्सल्यप्रेमाने  ओसंडून  जात असलेली दयाघन ज्ञानमूर्ती एकदम डोळ्यांपुढे  उभी राहते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या या भुमीचे वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माउलींच्या समाधीबरोबरच येथे असणारे विविध मठ, मंदिरे या मुळे या तीर्थस्थानाला एक वेगळेच पावित्र्य लाभले आहे.
     या मंदिरांची माहिती केवळ स्थानिकांना आणि नियमित येणाऱ्या भाविकांना आहे. समाधी मंदिराबरोबरच या मंदिरांची,मठांची माहीती सर्व भाविकांपर्यंत पोहचवणे,तसेच समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध घटकांना सर्व प्रकारची माहिती एकाच ठिकाणी मिळावी ,समाजाचे प्रबोधन कारअसणारे ,समाज सुधारक ,संत ,महंत,मठाधिपती ,विविध ठिकाणचे संस्थानिक यांच्याशी सहज संपर्क साधता यावा.
   कीर्तनकार ज्यांनी आजपर्यंत समाज सुधारणा करण्यासाठी समाजातील विविध ठिकाणी त्यांच्या कीर्तनाने आणि मधुर वाणीने समाज परिवर्तन घडवून आणले .



अशा सर्व कीर्तनकारांची माहिती ,त्यांचे संपर्क ,तसेच त्यांची कीर्तने जिथे जिथे असतील त्यांची वेळापत्रके या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे आणि आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात येणाऱ्या नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची जाणीव ,त्यांचा वारसा काय आहे यांची माहिती करून देणे आणि ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी "वारकरी संप्रदायाचा " पाया रोवला ,तो वारकरी संप्रदाय जगाच्या काना -कोपऱ्यात पोहचवणे हा या संकेत स्थळाचा उद्देश आहे .



       आळंदी हे गाव इंद्रायणी नदीच्या काठी खेडच्या ( राजगुरुनगर ) दक्षिणेस वसले आहे. इंद्राने पृथ्वीवर येऊन यज्ञयाग केले, त्यावरून हे नाव पडले. कुबेरगंगा असेही नाव होते. कुबेराने इंद्रायणीच्या काठी धन पुरून ठेवले होते. ज्ञानदेवांच्या पासून पुढे देहूला श्री तुकाराम महाराज इंद्रायणीच्या काठीच राहिले. तेव्हा ती ज्ञानोबा तुकारामाची"इंद्रायणी" म्हणून आबालवृद्धांच्या तोंडी बसली.साधु हे तीर्थांना तीर्थत्व  प्राप्त करून देतात. ज्ञानदेवांचा स्पर्श या मुळच्या पवित्र नदीला झाल्यामुळे ती आता परम पवित्र झाली आहे.
पौराणिक उल्लेख :-
आळंदी हे गावही ज्ञानदेवांच्या पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. ताम्रपटात 'आळंदीस' म्हणून जे उल्लेख सापडतात ते मात्र या आळंदी चे नाहीत.ते थेऊरच्या पूर्वेस असणाऱ्या दुसऱ्या आळंदी चे आहे. तिला चोरांची आळंदी म्हणतात. ही देवाची आळंदी म्हणून प्रसिद्ध आहे.स्कंद पुराणातील सह्याद्री खंडाच्या ६४ व्या अध्यायात आळंदीची वरुणा, अलका, कणिका, आनंद  व सिद्ध क्षेत्र अशी नावे  आली आहे.मराठी संतांनी तिला अलंकापुरी म्हटले आहे. ज्ञानदेवांच्या जन्मापूर्वीही सिद्धेश्वर हे शंकराचे स्थान प्रसिद्ध होते. म्हणून या आळंदीस'सिद्धेश्वर' म्हटले असावे.



  यादवकालीन उल्लेख :-
ज्ञानेश्वर महाराजांच्या देवळाला लागून पश्चिमेस हरिहरेंद्र ह्या नाथपंथीय स्वामींची समाधी आहे. तेथे त्यानंतर देऊळही बांधले आहे.तेथे स्वामींचे पूर्वज गुरुंच्या आणखी समाधी आहेत. त्यापैकी एका समाधीवर यादव काळातील काही पुसट उल्लेख आढळतात.या समाधीवर चंद्र सूर्य ही काढले आहेत. सूर्य व चंद्र ही नाथपंथीय चिन्हे आहेत. इतिहासकार यांनी जे संशोधन केले आहे, त्यावरून आळंदी हे गाव मध्ययुगीन ठरते.
ऐतिहासिक आळंदी उल्लेख :-
अलीकडील काळातील उल्लेख सांगायचा म्हटले म्हणजे शिवाजी महाराजांनी एका सनदेच्या द्वारा आळंदी येथील सव्वा दीडशे वारखे याजिराफ शेताचे १ खंडी २ मण धान्य श्री ज्ञानदेवांकडे देऊन टाकले आहे. आळंदी ही त्यावेळी चाकण प्रांतात समाविस्ट होती. या जमिनीचे व्यवस्थापक रामचंद्र गोसावी हे होते. शके १६१३ मध्ये आळंदी चे कुलकर्णी मोरो भास्कर यांच्या विनंतीवरून राजाराम महाराजांनी समाधीच्या बाबतीत ज्या व्यवस्था केल्या त्या पुढे चालविण्याबद्दल बाळाजी नारायण यांना आज्ञा केली  आहे.शके १६४५ मध्ये बाळाजी जाधव यांनी आळंदी यात्रा केल्याचा उल्लेख आहे शके १६६१ साली श्रीमंत पेशवे यांनी श्रींचे पूजा नैवद्यनंदादीपाचा खर्च अपुरा पडतो म्हणून आळंदी गाव श्रींकडे इनाम करून दिले आहे.

देवळासमोर गरुड पाराजवळ एक दीप माल आहे त्यावरील शिलालेख पुसलेला आहे. परंतु त्याचा उल्लेख 'कान्होजी आंग्रे' यांच्यापत्नी लक्ष्मिबाई यांनी ती दीपमाळ शके १६६५ मध्ये बांधली  आहे.

पेशवे सरकार शके १६७२ व १६७५ मध्ये कार्तिक यात्रेस आले होते. पेशवे सरकारांनी हे गाव ज्ञानेश्वर महाराज संस्थानाला इनाम दिले आहे.त्यातील वसुलापैकी १७२५ रुपये समाधीसाठी खर्च करावा, असे म्हटले आहे. 
शके १६८१, १६९६ मध्ये पेशवे सरकारांनी यात्रेत रखवालीसाठी माणसे पाठवण्याबद्दल दिलेले हुकुम आढळतात.आळंदीनजीक केळगाव येथील रानात श्री पांडूरंगाश्रम स्वामी यांनी देवालय बांधले व गोपाळकाला करू लागले. तेव्हा गोपाळपुराची वस्ती झाली.
    हा काळ शके १६७० चे सुमाराचा आहे.आळंदीत प्रवेश करतांना जो दगडी पूल आहे, तो पुण्याच्या ठाकूरदास अग्रवाल नावाच्या श्रीमंत सावकाराने १८२० मध्ये बांधला त्यास ८० हजार रुपये खर्च आला. आता या नदीवर नवीन पूलही बांधला गेला आहे. या पुलावर आल्यावर गावातील देवळांची शिखरे दिसतात.यात्रेकरुंच्या मुखातून 'श्री ज्ञानेश्वर महाराज की जय' असे म्हणून नामाचा गजर होतो. दोन्ही हात जोडले जातात आणि मस्तक शिखराच्या दिशेकडे झुकून विनम्र होते.
अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, जिथे नांदतॊ ज्ञानराजा सुपात्र

शुभमंगला इंद्रायणी नदीच्या काठी बसलेले  गाव म्हणजे आळंदी.सुमारे ७२५ वर्षापूर्वी इथे एक दिव्य-चरित्र घडले. श्री ज्ञानेश्वर महाराजांचा दिव्य अवतार व चरित्र घडले ते याच परम पावन क्षेत्रांत. त्याच्यां खाणाखुणा या गावाने अजून जपून ठेवल्या आहेत. श्री ज्ञानदेवांनी या ठिकाणी संजीवनी समाधी घॆतल्याने, ह्या गावाचे मह्त्व अमर होऊन गेले आहे. गेल्या ७०० वर्षात अनेक संतांच्या आणि ऎतिहासिक घटनांच्या पाऊल खुणा येथे उमटलेल्या आहेत. पौराणिक काळापासून हे गाव प्रसिध्द आहे. इतिहासकार राजवाडे य़ांच्या मते आळंदी हे गाव मध्ययुगातले आहे. इ. स. ७६८ च्या कृष्णराज राष्ट्रकूटांच्या तळेगाव ताम्रपटात आळंदी गावाचा उल्लेख आढळ्तो. इंद्राने पृथ्वीवर येऊन महायाग केला तो इथेच.
    स्कंद पुराणातील सहयाद्रि खंडाच्या ६४ व्या अध्यायात या गावाची वारुणा, अलका, कर्णीका, आनंद व सिध्दक्षेत्र अशी नावे आली आहेत. मराठी संतांनी या गावाचे नाव लडीवाळ्पणे अलंकापुरी ठेवले आहे. हरिहरेंद्र स्वामींच्या समाधीवर यादव काळातील उल्लेख सापडतात.श्री शिवाजी महाराजांनी एका शेताचे उत्पन्न श्री ज्ञानदेवांच्या समाधी स्थानास दिले होते. त्यानंतर राजाराम महाराज, बाळाजी बाजीराव पेशवे, पहिले बाजीराव वगैरेंनी आळंदी गावाकडे लक्ष पुरविले आणि आळंदीला गावपण दिले. क्षेत्राच्या सौदर्यांत भर पडली. त्यानंतर अनेक धनिकांनी या गावातील वास्तू बांधल्या.  इ. स.१८६७ साली येथे नगरपालिका स्थापन झाली.एस.टी. व महानगरपालिका बसेस अनेक ठिकाणांहून या गावी नियमित जात येत असतात. आळंदीस अनेक देशी परदेशी भाविक लोक भेट देतात.

ज्ञानेश्वरांची समाधी
अनेक ग्रंथ संपदांची  निर्मिती   केल्यानंतर  एके दिवशी आपले अवतारकार्य संपले असून जिवंत समाधी घेण्याचा आपला मनोदय ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांकडे व्यक्त केला. निवृत्तीनाथांना भरून आले. आपल्यापेक्षा फक्त दोन वर्षांनी लहान असलेला आपला हा भाऊ आपल्यासमोर लहानाचा मोठा झाला. आपल्यासमोर बाबांचा हात पकडून धुळपाटीवर मुळाक्षरे गिरवलेल्या या ज्ञानाने बघता बघता भगवतगीतेवर टीका करणारा अजरामर असा ग्रंथ लिहिला. लोकांनी प्रेमापोटी ज्ञानदेवाला ज्ञानेश्वर माऊली केलं आणि या वेडयाने मात्र सारं कर्तुत्व आपल्यावर ओवाळून टाकले. निवृत्तीनाथांचे डोळे भरुन आले. त्यांच्यातला ज्ञानाचा नाथदादा जागा झाला. आपला हा लाडका छोटा भाऊ, आपला हा लाडका शिष्य आपल्याला कायमचा सोडून जाणार या जाणिवेने निवृत्तीनाथ गहीवरले. भावनांना आवर घातला आणि जड अंतकरणाने आपल्या लाडक्या ज्ञानाला समाधी घेण्यास परवानगी दिली.
   ज्ञानेश्वरांची समाधी हे आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर आळंदीचे प्रवेशद्वार मानले जाते. अमृतानुभव लिहुन झाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी काही काळ आळंदी येथील एका गुहेत व्यतीत केला. नंतर याच गुहेत त्यांनी संजीवन समाधी घेतली. त्या जागी मंदीर बांधून आता सर्व वारकऱ्यांसाठी आळंदी हे तिर्थक्षेत्र झाले आहे. अमृतानुभव लिहून संपल्यानंतर ज्ञानदेव उत्तर भारतात संत नामदेवांबरोबर गेले. तेथे धार्मिक कार्य केल्यानंतर त्यांना आपल्या जन्माचे लक्ष्य साध्य झाल्याचे जाणवले. त्यांनी समाधी घेण्यची इच्छा व्यक्त केली. शके १२१८ मध्ये कार्तीक पक्षाच्या त्रयोदशी दिवशी ज्ञानेश्वरांनी समाधी अवस्थेत प्रवेश केला. या पुर्ण प्रसंगाचे वर्णन अभंग रुपात संग्रहित केले आहेत. हे अभंग नामदेवांनी लिहीले असून समाधीचे अभंगया नावाने ते प्रसिद्ध आहे.

पाहूनी समाधीचा सोहळा । दाटला इंद्रायणीचा गळा॥
बाळ सिद्ध पाहता चिमुकला।
कुणी गहिवरे कुणी हळहळे ।
भाळी लावून चरण रजाला चरणावरी लोळला॥
चोखा गोरा आणि सावता ।
निवृत्ती हा उभा एकटा ।
सोपानासह उभी मुक्ता अश्रूपुर लोटला॥
समाधीस्थान हे मध्यावर बांधलेले असून त्याच्या मागे एका लहान खोलीत समाधी आहे. या जागेवर ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली. तेथेच मागील बाजूस अजाण वृक्ष आहे. या वृक्षाला "इच्छापूर्ती वृक्ष" असे म्हटले जाते. या वृक्षाबाबत सांगितले जाते की त्याच्या मुळ्या ज्ञानेश्वरांच्या गळ्याभोवती आवळल्या गेल्यात असे संत एकनाथ महाराजांच्या स्वप्नात आले होते. ज्ञानेश्वर महाराज त्यांना स्वप्नात असे ही म्हणाले की या अजाण वृक्षाच्या मुळ्या काढून टाक.आज अजाण वृक्षाखाली भक्त पारायण करतात.
ज्ञानेश्वरांची ग्रंथ रचना
भावार्थदीपिका :
सर्व सामान्य  जनतेला संस्कृत भाषेतील भगवतगीता समजत  नव्हती म्हणून  निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृत मध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदिपीका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली. मराठी भाषेतील सर्वांत मोठा प्राचीन असा ज्ञानेश्वरीहा ग्रंथ ज्ञानदेवांनी नेवासे येथे लिहिला.  या ग्रंथाचे लिखाण बाबा सच्चिदानंद महाराज यांनी केले.
   ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्याचा शिरोमणी समजला जातो.हा ग्रंथ सामान्यांसाठी असून गीतेतील अध्यात्मिक ज्ञान त्यामुळे सामान्यांसाठी उपलब्ध झाले.सुमारे १८ खंडाचा हा ग्रंथ अनेक ओव्यांनी बनला आहे. आज ही वारकारी सांप्रदायातील अनेक लोक ज्ञानेश्वरीचे पारायण करतात. या ग्रंथातील विचार , त्यातील काव्याची सहजता, भाषेचे सौंदर्य याला तोड नाही. आज जेव्हा धर्म , अध्यात्म याबद्दल लिखाण केले जाते तेव्हा ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा वापर केला जातो.मराठी साहित्याचा अभ्यास ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाशिवाय पुर्ण होऊ शकत नाही.
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी ।
एक तरी ओवी अनुभवावी ॥॥
त्यांनी वयाच्या १५ व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरीम्हणजे मराठी भाषेतील धर्मग्रंथरूपी अजरामर लेणेच होय . पुढे ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांच्या आशीर्वादाने भावार्थदिपीका, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरीपाठाचे अभंग अशी अनमोल ग्रंथसंपदा निर्माण केली.



   अमृतानुभव :
जेव्हा ज्ञानेश्वरीचे लिखाण पुर्ण झाले तेव्हा ज्ञानेश्वरांना असे जाणवले की हा ग्रंथ स्वतंत्र नाही. यावर गीतेचा प्रभाव आहे. तेव्हा स्वत:च्या योगातील अनुभवावर , तत्त्वज्ञानावर त्यांनी अमृतानुभवम्हणजेचअनुभवामॄतहा ग्रंथ लिहला.
अमृतानुभव हा देखील मराठी साहित्यातील कलाकृतीचा उत्तम नमुना आहे. या ग्रंथाचा पाया हा अद्वैताचा सिद्धांत हा आहे. मराठीला अमृतापेक्षा जास्त गोडवा असल्याचा दावा करत ज्ञानेश्वर मराठीला पैजेत जिंकू असा विश्वास अमृतानुभव मध्ये व्यक्त करतात. याशिवाय योगी चांगदेवांना उद्धृत केलेल्या ६५ ओव्यांचा संग्रह असलेला चांगदेवपासष्टी हा ग्रंथ देखील आहे. तसेच १००० अभंग आणि हरिपाठ हा ज्ञानेश्वरांच्या साहित्याचा अमूल्य ठेवा आहे.
चांगदेव पासष्टी :
   ज्ञानदेवांच्या कीर्तीचे माप वाऱ्याहाती चालले होते. ते चौदाशे वर्षांच्या योगीराज चांगदेवाच्या कानी गेले. ज्ञानदेवांची पत्राद्वारे तरी भेट घ्यावी अशी त्यांना इच्छा झाली. पत्र लिहिण्यासाठी कागद घेतल्यानंतर सुरुवात चिरंजीव कि तीर्थरूप याने करावी असा संदेह त्यांच्या मनात निर्माण झाला. शेवटी त्यांनी तो कोरा कागद तसाच ज्ञानदेवांकडे पाठविला. तो कागद पाहिल्यावर मुक्ताबाई म्हणाल्या ,'दादा, बरा आहे कोरा कागद उपदेश करावयास , करा त्याला उपदेश .
   ' मग ज्ञानदेवांनी त्या कोऱ्या कागदावर पासष्ठ ओव्या लिहून  पाठविल्या .त्या आता 'चांगदेवपासष्टी' नावाने सुप्रसिद्ध आहेत .उत्कृष्ठ तत्वज्ञानाचा तो परिपाक आहे.चांगदेवांनी तो उपदेश वाचला . ते थक्क झाले व ज्ञानदेवांच्या भेटीस निघाले.

ऐतिहासिक वास्तू
आळंदीला संतांनी आपल्या अभंगांमध्ये गौरविले आहे. आळंदीला संतांचे माहेर, संतांचे विश्रांतीस्थान म्हटले आहे.

यात्रे अलंकापुरा येती |ते आवडी विठ्ठला ||
पांडुरंगे प्रसन्नपणे । दिधले देणे हे ज्ञाना ||
भुवैकंठ पंढरपुर । त्याहुनी थोर महिमा या ||
निळा म्हणे जाणोनि संत । धावत येती प्रतिवर्षी ||
सुवर्ण पिंपळ:
सुवर्ण पिंपळ वृक्ष दॆऊळवाड्यात फ़ार पुरातनकालापासून उभा आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आईचे भाग्य या वृक्षामुळे उदयाला आले आणि जगाला चार सोन्यासारखी मुले मिळाली.

श्री एकनाथ पार:
श्री ज्ञानेश्वरांच्या मंदिरात असलेल्या श्री केसरीनाथ मंदिरासमोरचा हा एकनाथ पार फार जुना होता.१९७६ साली चिंचवडचे ज्ञानेश्वर भक्त श्री.जगन्नाथ गणपती गावडे यांनी स्वखर्चाने पुन्हा बांधून संस्थानला अर्पण केला.या पारावर नाथांच्या पादुका बसविण्यात आल्या आहेत.

पुंडलिकांचे देऊळ:
पुंडलिकांचे देऊळ पुण्यातील एक सावकार चिंतामण विठ्ठल माळ्वतकर यांनी १८५७ साली बांधले.हे मंदिर इंद्रायणी नदीच्या पात्रात आहे.


नृसिंह सरस्वति महाराज मंदिर:
   श्री क्षेत्र आळंदी येथील ज्ञानेश्वरांच्या समाधी पासुन थोड्याच अंतरावर श्री नरसिंव्ह सरस्वती यांचा मठ आहे. श्री विठ्ठल रखुमाईच्या मुर्तीसमोर तिच्यावर गुरुवारी त्रिमुर्तीचा व अन्य दिवशी संन्याशी चेहऱ्याचा मुकुट ठेवलेला असतो. स्वामी अनेक वेळा आसेतुहिमाचल संचार करून आले आहेत. १७९६ च्या सुमारास ते आळंदी येथे आले.
   महाराजांचे भक्त असे मानत असत की श्री सदगुरु नरसिंव्ह सरस्वती महाराज हे गाणगापुर स्थित श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे अवतार आहेत.परंतु ही गोष्ट जर लोकांना माहित झाली तर आपले महत्त्व वाढेल असे महाराजांना वाटले. आळंदी हे माउलींचे क्षेत्र आहे आणि तेथे स्वत:चे महत्त्व वाढावे हे महाराजांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी स्वत:चे अवतार नाट्य काही काळ थांबवण्याचे ठरवले. त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभरुप.
    या अवतार रुपाचे कार्य पुर्ण झाल्यानंतर ते अव्यक्त रुपात राहिले. यानंतर श्री नृसिंह सरस्वती हा अवतार नाट्याचा पुढील अंक. या अवताराचे कार्य श्री शैल्य क्षेत्री पुर्ण झाले. याच नावाचा विग्रह करून नरसिंव्ह सरस्वती या नावाने ते भारतभर धर्मजागृतीचे कार्य करत राहिले व आळंदी येथे स्थित झाले.आळंदीच्या लोकांत त्यांनी भजनप्रेम निर्माण केले. ते भजनात स्वत: इतके रमुन जात की त्यांची भावणा समाधी लागत असे. स्वामींनी १८०७ मध्ये समाधी घेतली. प्रतिवर्षी पौष शुद्ध पौर्णिमेस त्यांच्या पुण्यतिथीचा मोठा उत्सव साजरा केला जातो.

संत जलाराम मंदिर :
   जलाराम यांचा  जन्म इसवीसन १८०० मध्ये गुजरात मधील वीरपुर येथे झाला. त्यांची आई साधुसंतांची सेवा हा धर्म मानत असे. वयाच्या १६ व्या वर्षी जलाराम बापांचा विवाह वीरबाई यांच्याशी झाला. पण वैवाहिक आयुष्यात त्यांना रस नव्हता. ते साधु-संतांची सेवा करण्यात धन्यता मानत. नंतर त्यांनी तीर्थयात्रा करण्याचे ठरवले. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी श्री भोजलराम यांचे शिष्यत्व स्वीकारले.त्यांना गुरुकडून गुरूमंत्रआणि गुरुमाळमिळाली. गुरुच्या आशिर्वादाने त्यांनी सदावर्त सुरू केले. तेथे त्यांनी खूप लोकांना अन्नदान केले. त्यांनी जातधर्म मानले नाही.

राघवदास महाराज :
आळंदी या तीर्थस्थानी ज्ञानेश्वरांची समाधी हे जरी महत्त्वाचे केंद्र असले तरी या ठिकाणी अनेक संत , माउलींचे भक्त होऊन गेले आहेत. राघवदास महाराजांचा जन्म बुधवार दि.१०-१-१९०६ (पौष शुद्ध पौर्णिमा शके १८२७ ) रोजी झाला. श्री राघवदास महाराज वयाच्या ९व्या वर्षी आपले मुळ गाव सातारा सोडुन आळंदीत येउन राहिले आणि याच मातीत विलीन झाले. त्यांचे मुळ नाव कृष्णा सखाराम रणभोर पण राघवदास या नावाने ते आळंदीत राहत होते. महाराजांनी चमत्कार केले पण ते प्रसिद्धीच्या मोहापासून दुर राहिले. कदाचित या मुळे ते अज्ञात राहिले. पण त्यांची माऊलींवरची अपार श्रद्धा त्यांना आळंदीकरांच्या मनात अढळ स्थान देणारी ठरली. रोज इंद्रायणीत सकाळी स्नान आणि नंतर माऊलींची सेवा, माधुकरी मागणे हा त्यांचा नित्यक्रम असे. कोणी म्हणे रामजपाचे, कोणी म्हणे गायत्री मंत्राचे पुरश्चरण त्यांनी साडेसत्तावन्न वर्षे केले. महाराज भोजलिंगकाका मंदिरात बसायचे .शिवाय ते गोपाळपुरा मंदिरात देखील वास्तव्यास होते. सोमवार दि.२३-८-१९८२ (ऋषी पंचमी शके १९०४) रोजी महाराजांनी समाधी घेतली.त्यांनी समाधी घेऊन २९ वर्षे उलटुन गेली तरी त्याचे अस्तित्व भक्तांना जाणवते. आळंदीत महाराजांचा जन्मदिवस पौष पौर्णिमा , ऋषी पंचमीला पुण्यतिथि व गुरुपौर्णिमा हे दिवस त्यांच्या स्मृतित साजरे केले जातात.

चांगदेव भिंत

उभारिला ध्वज तिही लोकांवरी। ऐसी चराचरी कीर्ती ज्यांची ॥१।
ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान । मुक्ताबाई ज्ञानदीप्तिकळा॥२॥
धरुन सगुणरुपे केली बाळ्क्रीडा । बोलविला रेडा निगमवाचे ॥३॥
बैसोनिया वरी चालविली भिंति। चांगदेवाप्रति दिली भेटी॥४॥
मग वास केला अलंकापुरासी । पिंपळ द्वारासी कनकाचा॥५॥
निळा म्हणे ज्याच्या नामे करता घोष। नातळती दोष कळिकाळाचे॥६॥

चांगदेव भिंत हे ज्ञानेश्वरांच्या चरित्रातील एक महत्त्वाचा प्रसंग आहे. योगी चांगदेव ज्ञानेश्वरांची महती ऐकून त्यांना भेटायला आले होते. पण त्यांना त्यांच्या विद्वत्तेचा गर्व होता. ते या भावंडांना भेटायला वाघावर आरुढ होऊन आले होते. त्यांच्या हातात नाग होता.ही गोष्ट ज्ञानेश्वरांच्या लक्षात आल्यावर त्यांनी ज्या भिंतीवर ते बसले होते त्या भिंतीला चालण्याची सुचना केली. एका निर्जीव भिंतीला चालवणाऱ्या ज्ञानेश्वरांना पाहताचत्यांचा गर्व मावळला. त्यांनी या भावंडांचे पाय धरले.त्या प्रसंगाचे प्रतीक म्हणून ही भिंत येथे आहे.


 


संत ज्ञानेश्वर समाधी सोहळा वर्णन

श्री क्षेत्र आळंदीतील कार्य संपविल्यानंतर माउलींना तिर्थयात्रा करूशी वाटली.तेव्हा त्यांना आपल्याबरोबर संत नामदेव महाराज असावो म्हणून त्यांना घेण्याकरत माउली पंढरपूरला गेले. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले-नामदेव महाराज, भगवंताच्या आज्ञेनुसार नामदेव महाराज तिर्थयात्रा करण्यासाठी निघाले.ते आपली आत्मचर्चा करीत सर्व तिर्थक्षेत्रे पाहिली नंतर पंढरपूरला  परत आले.

तीर्थे करोनी नामा पंढरीये आला,
जिवलगा भेटला विठोबासी,
सदगदीत कंठ वोसंडला नयनी,
घातला लोळणी चरणावरी—

नामदेव महाराज पंढरपूरला आल्यानंतर संत नामदेवांनी पंढरीच्या विठूराया चरणी आपले मस्तक ठेवले.आपला जिवलग आपल्याला भेटला या भावनेने त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले एवढी परमभक्ती इश्वरावर संत नामदेवांची होती.त्यानंतर संत नामदेवांनी माउलींसाठी मोठ्या थाटा माटात मावंदे घातले.त्यानंतर माउलींनी आपले इहलोकीचे कार्य संपले असून त्यांना पांडूरंग चरणी मिठी मारून पांडूरंगाला म्हणाले
मी आपली परवानगी घ्यायला आलो. मला तुमच्या चरणाजवळ समाधी घ्यावयाची आहे.
ज्ञानदेवो म्हणे         विठ्ठलाशी,समाधान तुंचि होसी,
                                 परि समाधि हे तुजपासी, घेईन देवो—

संत नामदेव महाराज तेव्हा ज्ञानदेवांचे हे वचन ऐकून भगवंत म्हणाले ज्ञानदेवा येथे तुम्हाला समाधी घेता येणार नाही, तर तुम्हाला पुण्यवचन असणारी  जी अलंकापूरी आहे तेथेच समाधी घ्यावी लागेल. अशा प्रकारे संत ज्ञानदेवांना भगवंतांकडून वचन मिळाले त्याचे नामदेवांनी खालिलप्रमाणे वर्णन केले.

कैलासाचा वास अधिक सिद्धबेट,विष्णूचें वैकूंठ पुरातन,
देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादि,येथेच समाधी ज्ञानदेवा,
अष्टोतरशे वेळा साधिली समाधी,ऐसे हे अनादि ठाव असे.

या ठिकाणी ज्ञानदेवांनी १०८ वेळा समाधी घेतली आहे.असे हे स्थळ सकळ सिद्ध आणि अनादि आहे व देवाने तसे वचनही दिले.

धन्य धन्य ज्ञानेश्वरा,पुण्यभूमी समाधि स्थिरा,
कृष्णपक्षी तुज निर्धारा,भेट देत जाईन,
कार्तिक मास शुद्ध एकादशी,पंढरीयात्रा होईल सरिशी,
दुसरी कृष्णपक्षी निर्धारिसी,तुज दिधली असे.....

यानुसार सर्व संतमंडळी दिंड्या पताका घेउन खिन्न मनाने खेद करत अलंकापूरीत निघाले.

संत करिती महाखेद,म्हणती ज्ञानंजन सिद्ध,
मग चालले विद्गद,अलंकापूरी..

नित्य निवृत्त असलेले निवृत्तीनाथ महाराज पण त्यांचाही कंठ दाटून आला.सोपान,मुक्ता,यांना तर रडूच कोसळले,नामदेव महाराजांच्या शोकास तर पारावारच राहिला नाही. त्याचप्रमाणे नारा, विठा, गोंदा, महादा आदीकरून संत मंडळींना फार वाईट वाटले. व ते खेद करत सर्व इंद्रायणीच्या तीरी आले.त्यात सर्वात पुढे नारा विठा चालत होते. मग

सकळही भक्त मेळी  सहित वनमाळी, बैसले तये पाळी  इंद्रायणीचे,
नारा विठा पुढे चाले,ऐसे इंद्रायणीस आले, सौदंडीवऋक्षातळी बैसले,
सपरिवारे सकळै भक्त...

अशा प्रकारे सर्व भक्तमंडळी सौदंडीच्या झाडाखाली बसले.माउली आता समाधी घेणार म्हणून सर्वांनाच खेद वाटत होता.नामदेव महाराजा विषयी तर बोलायलाच नको.
नामा होतसे खेदक्षिण,ज्ञानदेवाकारणे..

यानंतर सर्व संत मंडळी सौदंडीच्या झाडाखालून उठून जुनाट असे पवित्र शिवपीठ येथे आले व नारा विठा गोंदा महादा यांना तुळशी  बेल फुले भागिरथीचे पवित्र पाणी आणण्यास सांगितले.

नारा विठा गोंदा पाठविला महादा,साहित्य गोविंदा सांगितले,
तुळशी आणि बेल दर्भ आणि फुले,
उदक हे चांगले भागिरथीचे... कासाविस प्राण मन तळमळी,
जैसी का मासोळी जीवनाविण....

अशा त-हेने एकीकडे माउलींच्या समाधिची तयारी होत होती तर दुसरीकडे उपस्थीतांचं कंठ दाटून येत होते.पाण्यातील मासा ज्याप्रमाणे  पाण्याविना तळमळतो त्याप्रमाणे माउली आपल्यात यापुढे नाहित या भावनेने समस्त उपस्थित जनसमुदायाचे हृदय हेलावून गेले प्रत्येकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावू लागल्या.त्यावेळी स्वता माउली उपस्थीतांना म्हणाले,तुम्ही जर असे करू लागले तर समाधिला उशिर होईल. देव म्हणे असे
आठवाल फार,लागे उशिर समाधीसी...
असे म्हणून त्यांननी सिद्धेश्वरा समोरिल नंदी बाजूला सारून पूर्वीचे समाधीचे जुनाट स्थान दाखविले.
अष्टोतरशे वेळ समाधि निश्चळ,
पूर्वी तुझे वहनाखाली,
उठविला नंदी पाहिली जुनाट,
उघडिली शिळा विवराची,
बा माझी समाधि पहिली जुनाट,
केवळ वैकुंठ गुह्यगोप्य,
नामा म्हणे देवा पुरातन स्थान,ऐसे नारायणे दावियेले....

नामदेव महाराज म्हणतात,हे जुनाट स्थान माउलींनी आम्हाला दाखविले हे पाहून नारा विठा गोंदा महादा यांना समाधिची जागा स्वच्छ करावयास सांगितली.
नारा विठा गोंदा महादा पाठविला,
झाडविली जागा समाधिची...
नंतर हे सर्व वर आले यावेळी माउलींची सर्वांनी शोडषोपचारे पूजा केली व कंठ वाटून येउन सर्वांच्या तोंडून एकच उद्गार बाहेर आले

पूर्वी अनंत भक्त जाले,पुढे ही भविष्य बोलिले,
परि निवृत्ती ज्ञानदेवे सोडविले,
अपार जीवजंतु, नामा म्हणे भेटा लहान थोर सारे,
जातो ज्ञानेश्वर समाधिसी..

 नामदेव महाराजांनी सर्वांना सांगितले की तुम्ही सर्वजण भेटा माउली समाधिकडे जात आहेत.सर्व भेटल्यानंतर निवृत्तीनाथ व भगवंतनाने  एका एका हाताला धरून माउलींना समाधि स्थानावर वसविण्याकरता चालले.

देव निवृत्ती यांनी धरले दोन्ही कर,
जातो ज्ञानेश्वर समाधिसी..

ज्ञानदेव आता आसनावर जावून बसले व भक्त मंडळींनी त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवली.नंतर भगवंताने ज्ञानदेवांच्या मस्तकावर हात  ठेवला नंतर दर्शन घेतले.त्यावर देव पुढे म्हणाले हे पहा जोपर्यंत चंद्र सुर्य आहेत माउलींची समाधि तोपर्यंत स्थिर राहिल.
जाउनि ज्ञानेश्वर बैसले आसनावरि,
पुढे ज्ञानेश्वरी ठेवियेली,
हस्त ठेविला माथया,
ज्ञानदेव लागे पाया,
विठोजी म्हणे लवलाह्या,
समाधिस बैसावे,
देव म्हणे ज्ञानेश्वरा.चंद्र तारा जव दिनकरा,
तव तुम्ही समाधि स्थिरा,राहे तारा हे निरंतर..

माउलींनी तिन वेळेस आता नमस्कार करून डोळे झाकले.
त्यावेळी त्यांची अवस्था काय झाली हे वर्णन करणे कठिण.अशा परिस्थितीतही
भगवंतांनी सर्वांना कठिण अंतकरणाने बाहेर आणले व त्यास शिळा बसविली. तीन वेळा जेव्हा
जोडिले करकमळ,झाकियेले डोळे ज्ञानदेवे,
नामा म्हणे आता लोपला दिनकर,बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ...
घातयली शिळा माधीसी..
सोपान मुक्ताबाई तर आपले अंग धरणीला टाकू लागले.
सोपान मुक्ताबाई सांडिती शरिरा,म्हणती धराधरा निवृत्तीसी...
माउलींनी समाधी घेतल्यानंतर या भक्त मंडळींनी काय अवस्था झाली हे नामदेव महाराज वर्णन करतात.जे प्रवृत्तीवर कधी न येणारे  असे निवृत्तीनाथ महाराज यांचीअवस्था काय झाली.
वोसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला, आणिकाच्या डोळा अश्रु येती,
अमर्यादा कधी केली नाही येणे, शिष्य गुरूपण सिद्धी नेले...
विलाप मांडियेला भक्ती, खंती करिती त्रिजगती,
ज्ञानदेवा सारखी मूर्ती,न देखे म्हणती देवराया,
नामा म्हणे संत कासाविस सारे, लावित पदर डोळियांसी...
निवृत्तीदेव म्हणे करिता समाधान,काही केल्या मन राहत नाही,
बांधल्या पेंढिचा सुटलासे आळा,तृण रानोमाळा पांगलेले,
हरिणीवीण खोपी पडियेली वोस, दशदिशा पाडसे भ्रमतांती,
मायबापे आम्हा त्यागियेले जेव्हा,ऐसे संकट तेव्हा जाले नाही,
नामा म्हणे देवा पेटला हुताशन,करा समाधान निवृत्तीचे...
 भगवंताने देखील आपले मन पुष्कळ आवरले पण नाईलाज झाला.भगवंताच्या डोळ्याला देखिल अश्रु आले.त्यावेळी रखुमाई म्हणाल्या हो आतापर्यंत पुष्कळसे गेले त्याबद्दल खेद केला नाही.कित्येक जन्माला आलेत त्याबद्दल आनंदही नाही. तर आज हे काय त्यावेळेसे  देव रूक्मिणीला म्हणतात की रूक्मिणी मी हा एक योगी डोळ्याने पाहिला आहे आणि त्रैलोक्याचे हेच एक जीवन आहे.
देवो म्हणीती रूक्मिणी, हा येचि युगी देखील नयनी,
हेचि ज्ञान संजिवनी,जाण त्रिलोक्यासी..

भगवंत आता पर्यंत कोणाकरिताही रडले नाही परंतु माउलींच्या समाधिचे वेळी प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.तेवढ्यात नामदेव  महाराज पुढे आले व भगवंताला म्हणाले माउली सोडून गेले त्यासाठी माझा जीव कासावीस होत आहे.
मग प्रश्न आदरिला,नामा स्फुदो जो लागला,
कागा ज़ानदेवी गेला,मज सांडोनिया,
 भगवंत नामदेवांची सजूत घालू लागले. असे नामदेवा रडू नकोस ते कोण होते त्याची तुला कल्पना नाही.
ज्ञानदेव ज्ञान सागरू,ज्ञानदेव ज्ञान गूरू,ज्ञानदेव भवसिंधु तारू,प्रत्यक्ष रूपे असे...
अशाप्रकारे सर्वच मंडळी शोक करत होते. एवढ्यात भगवंताने सांगितले आता आपणास पंढरपूरला जावयाचे आहे असे म्हटल्यावर  सर्वांनी कठिण अंतकरणाने ज्ञानदेवांच्या समाधिला प्रदक्षिणा घातली व सर्वांनी नमस्कार केला. सह मंडळी सारे उठले ऋषिश्वर,केला नमस्कार समाधिशी...

सर्व मंडळी बाहेर पडले माउलींच्या नावाचा जयजयकार केला. वैष्णवांचे भार निघाले बाहेरकेला जयजयकार सर्वांनी.....

No comments:

Post a Comment